पावसाने आपली दिशा बदलल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले
मंचर – गेल्या चार-पाच वर्षांत पावसाने आपली दिशा बदलल्यामुळे व पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्यासह देशभरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यंदा ही पाऊस चांगल्या प्रमाणात आहे, असे मत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डख बोलत होते. ते म्हणाले की गेल्या पाच वर्षात हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे ऋतू 22 दिवसांनी पुढे सरकले असून त्यामुळे पाऊसही उशिरा येत आहे. दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात पाऊस येत असे; मात्र आता तो पाऊस 22 दिवसांनी पुढे ढकलला आहे.
या पुढे महाराष्ट्रात 27/28 जून तर 10 जुलै ते 15 जुलै, पुन्हा 18 जुलै 19 जुलै या तारखांना राज्यातील 80 टक्के भागांत पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. तापमान वाढीमुळे पाऊस मोठ्या प्रमाणात वाढला असून पावसाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी चर्चेत भीमाशंकर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, अशोक आदक पाटील, साहेबराव मेंगडे यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश स्वामी थोरात यांनी तर अरुण बांगर यांनी
आभार मानले.
सप्टेंबर, डिसेंबरमध्येही पाऊस
दरवर्षी 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या दरम्यान राज्यात पाऊस होणार आहे. तसेच राज्यात 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर या पाच ते सहा दिवसात अवकाळी पाऊस होणार असून त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी शेती पिकांचे नियोजन करावे. तसेच पावसाचा अचूक अंदाज सांगून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊ देणार नाही, असे पंजाबराव डख यांनी नमूद केले.