मुंबई – शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणीचा प्रश्न मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. मात्र गुरुवारपासून शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेण्यास तयार झाले. मात्र त्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांवर टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेशी द्रोह केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, “सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत सरकारने निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांनीही आतापर्यंत टाळाटाळ केली. आता त्यांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रातील सरकारच बेकायदेशीर आहे. राज्यात एक फुल दोन हाफ सरकार आहे.”
पुढे राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले की, “राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करण्यास तयार नाही. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांनी सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. आता अपात्रतेचा निर्णय घेण्यास अजून किती कालावधी लागणार सांगता येत नाही. याआधी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार होतं. ते सरकार पाडलं. मुख्यमंत्र्यांसह आधी 16 जण आणि नंतर काही अपात्र होते. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार फोडण्यात आले. ते देखील अपात्र आहेत.”
“शिवसेनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार घटनाबाह्य असल्याचं सांगितलं आहे. तरीही ज्यांचा पक्षांतर करणे धर्म आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चालढकल करत आहेत. त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला आहे. एका वर्षापासून राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय घेतले. राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. घटनेवर ज्यांनी काम केले ते देखील सध्याची स्थिती पाहून स्वर्गात अस्वस्थ झाले असतील,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.