नवी दिल्ली – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे राहुल यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. याला चोवीस तास पूर्ण होताहेत तोच राहुल गांधींचे संसद सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रया देखील दिल्यात आहेत.
अश्यातच, आता या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी देशाच्या सध्याच्या राजकारणावरुन कडाडून टीका केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश राज म्हणाले, “माझ्या प्रिय नागरिकांनो, या देशाच्या रहिवाशांनो, आजच्या प्रकारानं देशाच्या राजकारणाची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जो काही प्रकार झाला आहे त्याला काय म्हणावे असा प्रश्न आहे.
अतिशय हिणकस आणि किळसवाण्या गोष्टीनं मनाला खूप वेदना झाल्या आहेत. राजकीय क्षेत्र किती वेगळ्या थराला गेले आहे हे दिसून आले आहे. आणि आपण अजनुही शांत बसणार असाल तर ते वेळ गेलेली नाही. देशासाठी बोलण्याची वेळ आली आहे’. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांचं हे वक्तव्य सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे.
राहुल गांधींना शिक्षा झालेलं प्रकरण नेमकं काय ?
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते,सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे? त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्याने दावा केला की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.