चेन्नाई, – भाजपच्या गैरकाराभारापासून साऱ्या देशाला वाचवण्याची जबाबदारी आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपच्या विरोधात एकसंध आघाडी उघडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.
आज तामिळनाडुतील एका जाहीर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या फॅसिस्ट प्रवृत्तीच्या राजकारणामुळे साऱ्या देशाचा श्वास गुदमरला आहे. अशा स्थितीत भाजपला भक्कम राजकीय पर्याय देण्यासाठीची आघाडी बांधण्याची जबाबदारी राहुल गांधी यांची आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी आता ठामपणे पुढाकार घ्यावा अशी आग्रही विनंती मी त्यांना करीत आहे. जेव्हा आम्ही फोनवर बोलतो त्यावेळी मी त्यांना सर असे संबोधतो. त्यावेळी राहुल गांधी मला आवर्जून सुचवतात की सर नाही भाऊ म्हणा. त्या भावाच्या अधिकारात मी राहुल गांधी यांना आता मागे राहु नका भाजपच्या विरोधात राजकीय पक्षांची पक्की मोट बांधा अशी सुचना करतो आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की सन 2019 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 37 टक्के मते मिळाली. याचा अर्थ 63 टक्के मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे तरीहीं भाजपला बहुमत मिळाले आहे कारण ही 63 टक्के मते विविध पक्षांमध्ये विभागली गेली. गेल्यावेळी भाजपच्या विरोधात महाआघाडी करण्याची घोषणा झाली पण प्रत्यक्षात या आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात लढले त्यामुळे भाजपचे फावले आहे. आता अशी वेळ पुन्हा न येऊ देण्याची जबाबदारी राहुल गांधी यांचीच आहे असे ते म्हणाले.