सुमारे तीन वर्षांपासून कॉंग्रेसचे कामकाज पूर्णवेळ अध्यक्षाविना सुरू आहे. पुढील काही महिन्यांत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होऊन पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची चिन्हे आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे त्या पदावरील कमबॅक जवळपास निश्चित मानले जात आहे. राहुल यांनी नुकतीच मांडलेली भूमिका पाहता ते पुन्हा अध्यक्ष बनण्यास सज्ज होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राहुल यांनी नुकताच तेलंगण राज्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी तेलंगणमधील कॉंग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. बेशिस खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी तेलंगणमधील पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीविषयीची भूमिकाही अधोरेखित केली. कुणीही कॉंग्रेसची उमेदवारी गृहीत धरू नये. जनतेचे मत जाणून उमेदवारांची निवड होईल. थोडक्यात, जनताच इच्छुकांना तिकीट देईल. त्यामुळे कठोर मेहनत घ्या आणि जनतेपर्यंत पोहचा, असे ते म्हणाले. त्या भूमिकेतून राहुल यांनी देशभरातील कॉंग्रेसजनांना संदेश दिल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
राहुल यांनी स्पष्ट शब्दांत मांडलेली भूमिका किंवा कॉंग्रेसजनांना दिलेला कानमंत्र पुढील घडामोडींची नांदी मानली जात आहे. राहुल यांनी एकप्रकारे कॉंग्रेसच्या पुढील रणनीतीचे सूतोवाच करताना पक्षातील असंतुष्टांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे ते पुन्हा अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यास तयार होत असल्याचेच सूचित होत आहे. राहुल यांनी डिसेंबर 2017 मध्ये पक्षाध्यक्षपद स्वीकारले. मात्र, सलग दुसऱ्यांदा 2019 मधील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा नामुष्कीजनक पराभव झाला. पक्षाच्या त्या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी जुलै 2019 मध्ये पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोनिया गांधी यांच्याकडे सोपवण्यात आली.
सलग दोन लोकसभा निवडणुका आणि विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसच्या पीछेहाटीचे सत्र कायम राहिले. त्यामुळे कॉंग्रेसमधील अस्वस्थता शिगेला पोहचली. असंतुष्टांनी डोके वर काढले. अनेक बड्या नेत्यांनी कॉंग्रेसचा हात सोडल्याने पक्ष आणखीच गलितगात्र वाटू लागला. पक्ष संघटनेतील मरगळ ठळकपणे जाणवू लागली. मात्र, तसे असूनही राहुल एकांड्या शिलेदाराप्रमाणे राजकीय रणांगणात लढताना दिसत आहेत.
आता पुढील काही महिन्यांत कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड निश्चित आहे. त्या निवडीचा मुहूर्त जवळ येत असतानाच कॉंग्रेसमधून नेतृत्वाबाबत पुन्हा भिन्न मतप्रवाह पुढे येऊ लागले आहेत. काही नेत्यांनी गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष नेमण्याचा मुद्दा पुढे केला. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी यांनी तो मुद्दा पुढे करणाऱ्यांना वस्तुस्थितीचा आरसा दाखवला. गांधी परिवार हे पक्षाचे शक्तिस्थान आहे. त्या परिवाराशिवाय कॉंग्रेस स्वीकारार्ह ठरणार नाही, असे परखड मत अँटनी यांनी मांडले.
गांधी परिवारातील सदस्याव्यतिरिक्त देशभरातील कॉंग्रेसजनांना मान्य होईल आणि जनता स्वीकारेल असा चेहरा कॉंग्रेसकडे नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातीलच असेल आणि नवे अध्यक्ष राहुलच असतील, अशी खूणगाठ बांधली जात आहे. नव्या अध्यक्षाच्या निवडीआधी राहुल यांच्या समर्थकांनी 2018 मधील कॉंग्रेसच्या कामगिरीचा दाखला देण्यास सुरूवात केली आहे. त्यावर्षी राहुल अध्यक्ष असताना कॉंग्रेसने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढ या तीन राज्यांत सत्ता मिळवली.
2012 ते 2022 या कालावधीचा विचार करता 2018 मधील पक्षाची कामगिरी सर्वांत सरस ठरली, याकडे राहुल समर्थक लक्ष वेधत आहेत. त्यातून ते राहुल यांनी पक्षाध्यक्ष म्हणून कमबॅक करावे यासाठी वातावरण निर्मिती करत असल्याचे म्हणता येईल. राहुल यांनीही तेलंगणमध्ये मांडलेली भूमिका पाहता ते पक्षाची धुरा पुन्हा खांद्यावर घेण्यास तयार झाल्याचे मानता येईल.