भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी टीम इंडियाच्या टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) पुढचा टी-20 संघाचा कर्णधार बनवल्यास त्यात काही गैर नाही कारण या बदलाची गरज आहे, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकमध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली नव्हती. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माची कामगिरीही अत्यंत खराब राहिली.
#INDvsNZ | “पुढील T20 विश्वचषकाची तयारी सुरू…,” हार्दिक पंड्याचा सूचक इशारा
या सर्व कारणामुळे रोहितच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता पुढील टी-20 विश्वचषकासाठी नव्या कर्णधाराच्या नावांबाबत चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) कर्णधारपदाबद्दल म्हटले की, “टी-20 मध्ये वेगळा कर्णधार असणे ही गोष्ट चांगलीच आहे. सध्याच्या काळात जास्त क्रिकेट खेळले जाते त्यामुळे सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळणे खेळाडूसाठी सोपे नाही. जर रोहित शर्मा आधी आहे तसाच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, तर हार्दिक पंड्याला टी-२० साठी कर्णधार बनवायला काहीच हरकत नाही.”
यापूर्वी 1983 चा विश्वचषक विजेता खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत यांनीही हार्दिक पंड्याला ( Hardik Pandya ) टी-20 संघाचा कर्णधार बनवण्याबाबत भाष्य केले होते. श्रीकांत यांच्या मते, “मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर मी म्हणेन की हार्दिक पंड्या 2024 च्या टी-20 विश्वचषकाचा कर्णधार असावा. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतूनच भारतीय संघाची पुनर्रचना करावी.” असेही ते म्हणाले.