नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कशाचच गांभीर्य नाही आणि ते राजकारणासाठीच अयोग्य असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केले आहे. विशेष म्हणजे 2015 पर्यंत सरमा हे कॉंग्रेसमध्ये होते. त्यावेळी आणि आता राहुल यांची वागणूक कशी होती व भाजप कसा वेगळा पक्ष आहे याबाबत त्यांनी एक सविस्तर मुलाखत दिली आहे.
सरमा म्हणाले, राहुल गांधी आता तुमच्याशी बोलत असतील तर मध्येच बाहेर जॉगिंगला निघुन जातात. किंवा आतल्या खोलीत चालले जातात. तुम्ही त्यांची वाट पाहत थांबता आणि ते अर्ध्या एक तासाने परत येतात. त्यांचे कुटुंब मोठे आहे आणि सामंत असल्यासारखे त्यांचे वागणे असते. आजही ते कॉंग्रेसचे अध्यक्ष नाहीत. मात्र सगळे निर्णय तेच घेतात.
याचा अर्थ त्यांना जबाबदारी कोणतीच नको आहे मात्र अधिकारांचा वापर ते करतात. जर लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे तर संपूर्ण कॉंग्रेस पक्ष त्यांच्या मागे का जातो असा सवालही सरमा यांनी केला. राहुल यांना लक्ष्य करताना ते म्हणाले की यूपीए 1 आणि यूपीए 2 सरकारच्या काळातही राहुल यांच्याकडे कोणते पद नव्हते. मात्र सगळे जण त्यांच्याकडेच जात होते. उत्तर द्यायला नको. मात्र सगळी सत्ता हवी असा हा प्रकार आहे.
राहुल यांच्याबाबत कोणी बोलत नाही
सरमा म्हणाले की कॉंग्रेस पक्ष सोडण्याबाबत मी द्विधा मनस्थितीत होतो. राहुल यांचे शिक्षण झाले त्याच शाळेत तेव्हा माझा मुलगा नववीत शिकत होतो. तो म्हणाला की आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी असले तरी राहुल यांच्या बोलण्याने कोणीही प्रभावित होत नसल्याची चर्चा मुलांमध्ये होते. राजकारणाशी दूरान्वये संबंध नसणारे 8वी 9वीतील मुले असे बोलत असतील तर त्या पक्षात आपण राहायला काय अर्थ आहे असा विचार करून आपण कॉंग्रेस सोडली.
भाजपमधील प्रवेशानंतर तेथील आपुलकीच्या वातावरणाशी जुळवुन घ्यायला सहा महिने लागले असे सांगताना ते म्हणाले की कोणत्याही मंत्र्याच्या घरात तुम्ही थेट जाऊ शकता. आम्ही अमित शहांच्या स्वयंपाक घरातही गेलो आहे. कॉंग्रेसमध्ये त्यांच्या व्हरांड्याच्या पुढे जाता येत नाही.