कोलकता – ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळली. भारत जोडो यात्रेमुळे राहुल यांची आदरणीय नेता अशी प्रतिमा बनली आहे. आता ते पंतप्रधानपदासाठी विरोधकांच्या गोटातील आघाडीचे उमेदवार बनले आहेत, असे सिन्हा यांनी म्हटले.
जनतेने राहुल यांना नेता म्हणून स्वीकारले आहे. लाखों लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. राहुल यांनी नेतृत्वक्षमता सिद्ध केली आहे. पंतप्रधानपदासाठी ते पुरेसे सक्षम वाटू लागले आहेत, असे सिन्हा पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हणाले. यात्रेमुळे पुढील लोकसभा निवडणुकीत मते खेचण्यात कॉंग्रेसला यश मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
राहुल यांना मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व आहे. आता दिसणाऱ्या उत्साहाचे 20 टक्के मतांमध्ये रूपांतर झाले तरी ते देशासाठी आणि विशेषत: कॉंग्रेससाठी चांगले ठरेल. राहुल यांची यात्रा देशातील ऐतिहासिक यात्रांपैकी एक आहे. त्या यात्रेची तुलना भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेशी करता येऊ शकेल.
आडवाणी आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या यात्रांमुळे याआधी मतांमध्ये रूपांतर होऊ शकते हे आपण अनुभवले आहे, असे भाष्य सिन्हा यांनी केले. देशात सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. विरोधकांकडे फ्रंटरनर म्हणून राहुल आणि गेमचेंजर म्हणून तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आहेत. त्यामुळे काहीच अशक्य वाटत नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
शरद पवार यांना म्हटले खरे चाणक्य
कॉंग्रेसच्या यात्रेमुळे विरोधकांना एकत्र आणण्यासाठी हातभार लागेल, असे मत नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्याविषयी सहमती दर्शवत सिन्हा यांनी पवार यांचा उल्लेख भारतीय राजकारणातील खरे चाणक्य म्हणून केला.