Rahul Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी यांचे घर असलेल्या मणिभवन येथून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ‘न्याय संकल्प पदयात्रा’ काढली. यावेळी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेते व समाजातील विविध वर्गातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ( Rahul Gandhi )
ऑगस्ट क्रांती मैदान हे स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार असलेले मैदान आहे. येथूनच ब्रिटीशांना चलेजावचा इशारा देण्यात आला होता. यावेळी इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेतही या पदयात्रेत राहुल गांधी यांच्या समवेत सहभागी झाले होते.
तत्पुर्वी मणिभवन येथे उपस्थितांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “महात्मा गांधी यांनी अन्यायाच्या विरोधात अहिंसक पद्धतीने लढा दिला आणि तो यशस्वी करून दाखवला. ते म्हणाले की दक्षिण अफ्रिकेतील लढ्यालाही महात्मा गांधींच्या मुल्यांची जोड होती.
मी जेव्हा दक्षिण अफ्रिकेत गेलो, त्यावेळी तेथील लोकांनी आपल्याला सांगितले की आमच्या लढ्याची जी हत्यारे होती ती या देशातील शिकवणुकीची नव्हती, ही हत्यारे आम्हाला महात्मा गांधी यांनी दिली आहेत.
आज देशातील एक घटक दुसऱ्या घटकाचे दु:ख समजून घेत नाही. जेव्हा आपण एकमेकांची दु:खे समजून एकमेकांच्या पाठीशी उभे राहू तेव्हाच एक मोठी चळवळ त्यातून उभी राहील. ( Rahul Gandhi )
आपण दुसऱ्याच्या लढ्यात सहभागी झालो तर दुसराही आपले संरक्षण करण्यास पुढे येईल याची खात्री बाळगा आणि गांधींच्या प्रेम, सत्य आणि अहिंसेच्या तत्वाच्या आधारे देशात मोठी चळवळ उभी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काल राहुल गांधी यांनी त्यांच्या ६३ दिवसांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप डॉ. आंबेडकर यांच्या मध्य मुंबईतील ‘चैत्यभूमी’ स्मरणस्थानी आदरांजली अर्पण करून आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून केला. ही यात्रा, १४ जानेवारीला संघर्षग्रस्त मणिपूरमधून सुरू झाली होती.