नवी दिल्ली – लखीमपुर खेरीला शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना ठार मारण्याचा जो प्रकार झाला आहे तो नियोजनबद्ध कट होता असा निष्कर्ष विशेष चौकशी पथकाच्या अहवालात काढण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर यातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांचे वडिल व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केली.
या एसआयटी अहवालावर संसदेत व्यापक चर्चा केली जावी अशी मागणीही त्यांनी केली. आज राज्यसभेतही या अहवालावरून मोठा गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकुब करावे लागले. लोकसभेतही या विषयावरून मोठा गदारोळ झाला. तथापि या गदारोळातच मंत्र्यांनी त्यांच्या कामकाजाच्या संबंधातील निवेदन सभागृहात केले.
उत्तरप्रदेश पोलिसांच्या एसआयटी अहवालाच्या संबंधात राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तहकुबी प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारने गृहराज्यमंत्र्यांची त्वरीत हकालपट्टी करून या घातपाती प्रकारात ज्यांचे बळी गेले आहे त्यांच्या कुटुंबियांना त्वरीत न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
आशिष मिश्रा यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गैरहेतूने मुद्दाम गाडी घातली. आणि हा प्रकार सुनियोजीत कट होता असे एनआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आशिष मिश्रा यांच्यावर कडक गुन्हे नोंदवले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. सध्या त्यांच्यावर केवळ बेजबाबदार ड्रायव्हींग केल्याच्या संबंधातील किरकोळ गुन्हे दाखल आहेत.