औंध, दि. 25 (प्रतिनिधी) -औंध, बाणेर, बालेवाडी, बोपोडी परिसरातील नागरिकांनी विविध समस्या तसेच प्रश्न उपस्थित करीत उत्तर द्या, समस्या कधी सोडविणार? असा जाब सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला.
औंध क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. मोहल्ला कमिटीच्या या मिटींगला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली, त्यांनी समस्या मांडत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारले. अधिकाऱ्यांनीही याबाबत समाधानकारक उत्तरे देत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
बाणेर ते सकाळ नगरपर्यंत झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत मोहल्ला कमिटी मिटींगमध्ये नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सदर रस्ता मेट्रोचे काम चालू असल्यामुळे या रस्त्याचे संपूर्ण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मेट्रोचे काम चालू असलेल्या ठेकेदारांनी करणे अपेक्षित आहे तसेच याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबरोबरच बाणेर परिसरामध्ये पूररेषेमध्ये टाकण्यात येत असलेल्या राडारोडाबाबत देखील नागरिकांनी कारवाईची मागणी केली. यावेळी स्मार्ट सिटी तर्फे रस्त्यांची कामे करताना फुटपाथ मोठे केल्यामुळे यावर अनेक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेत पाथरी व्यवसायिक अतिक्रमण करत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. रस्त्याकडेला मोकळ्या भागांमध्ये पत्र्याचे शेड मारून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभारण्यात आले आहेत. यावर कारवाई कधी करणार, असा सवालही नागरिकांनी केला. औंध रोड, बोपोडी परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयांची दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचेही नागरिकांनी सांगितले.