– समीर भुजबळ
वाल्हे (पुणे) – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील सुकलवाडी येथील रेल्वेगेट भुयारी मार्गाचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात चर्चेला येतो. आणि केवळ आश्वासन, चर्चेच्या गुर्हाळ्यात तो गुंडाळला जातो. आताही नवनियुक्त सदस्यांनी पाहणी करून पुण्यात रेल्वेच्या अधिकार्यांसमवेत भेट घेत चर्चा केली. दरवर्षी हेच होते आणि पावसाळा संपतो तरी या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासन नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे का, असा संतप्त सवाल वाल्हे परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
थोडाजरी पाऊस झाला तरी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील सुकलवाडी रेल्वे गेट भुयारी मार्गात पाणी साचून राहते, त्यामुळे दरवेळी हा मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ ठप्प होतो जर साचलेल्या पाण्यातून चालकाने वाहन दामटले तर त्याला गॅरेजमध्ये नेण्याशिवाय पर्याय नसल्याचे वास्तव दरवर्षी समोर येते तरी या गंभीर प्रश्नाकडे रेल्वेप्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक कशी होते, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. सध्या तर या भुयारीमार्गाच्या भिंतीची पडझड होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेचे सदस्य प्रवीण शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे मंडलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बुधवारी (दि. 9) रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीमध्ये रेल्वे अधिकार्यांनी आंबळे, राजेवाडी, बेलसर, पिसर्वे, नायगाव, धालेवाडी येथील स्थानिक निवडक नागरिक, पदाधिकार्यांबरोबर चर्चा करण्यात आली. स्थानिक नागरिक व पदाधिकार्यांकडून सुचवण्यात आलेल्या पर्यायांवर सविस्ततर चर्चा करण्यात आली.
वाल्हे येथील सुकलवाडी फाटा येथील रेल्वेच्या भुयारी मार्गात येथून पुढच्या काळामध्ये नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची ग्वाही देण्यात आली. या बैठकीस रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष बाजपेयी, मध्य रेल्वे विभागीय अभियंता नजिबउल्ला शेख, डीआएम पुणेचे सचिव मिलिंद वाघोलीकर, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार, आंबळेचे उपसरपंच सचिन दरेकर, प्रा.संतोष नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीतील चर्चा
भुयारीमार्गातील पाणी करंजनाला येथील ओढ्यामध्ये ड्रेनेज लाइनच्या माध्यमातून सोडण्यात यावे असे स्थानिकांनी सुचविले. येत्या 10 दिवसांमध्ये भुयारीमार्ग परिसरातील जागेचे सर्वेक्षण करून, या सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे प्रशासन व वाल्ह ग्रामपंचायतीस सादर करून, लवकरात-लवकर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. जोपर्यंत ड्रेनेजलाइनचे काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत येथे 24 तास पाणी काढण्यासाठी मोटर पंपाची सोय करणार असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्षात कामस कधी सुरूवात होईल हे येणारा काळच ठरवले तोपर्यंत पाणीसाचणार आणि त्यातूनच मार्ग काढत जावे लागणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्य आहे.