खेड शिवापूर (पुणे) – खेड शिवापूर परिसरात शनिवार (दि. 5) पासून पीएमपीएमएलच्या बसेस त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा सुरू झाल्या होत्या. शनिवारी (दि. 12) खेड शिवापूर टोल नाक्यावर एसटी महामंडळाचा फास्टटॅग संपला होता त्या कारणाने तर पीएमपीएमएल टोल भरत नसल्याने त्या वाहनांची अडवणूक केली होती, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
यावेळी कापूरहोळ ते कात्रजपर्यंत तिकीट काढलेल्या प्रवाशांना टोलनाक्यावर उतरून दुसऱ्या वाहनाने पुण्याला जावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. जवळपास तीन महिने बस तसेच खासगी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातून पुणे शहरात येणाऱ्या हजारो कामगार वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले होते.
परिसरात स्वतःचे वाहन नसलेले कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे बस हाच वाहतुकीचा मुख्य पर्याय होता; मात्र बस बंद असल्याने दुसरा कोणताच पर्याय नसल्याने घरीच बसावे लागले होते. आता बस सुरू झाली तर पुन्हा टोलचा प्रश्न उद्भवल्याने आम्ही काय करायचे असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.
राज्य परिवहन महामंडळाच्या या कारभारामुळे तसेच पीएमपीएमएलच्या आणि टोल प्रशासनाच्या भांडणात प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. नेहमीच दोघांच्या भांडणात तिसऱ्याला तोटा सहन करावा लागत आहे हे संबंधित प्रशासनाला का समजत नाही? हे न उलगडणारे कोडे आहे.
पीएमपीएमएलचे म्हणणे…
पीएमपीएमएलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाच्या निर्देशानुसार 3 एप्रिल 2021 रोजी वाहतूक सेवा बंद केली होती; परंतु त्यावेळी रोज 12 बसेस सोडल्या जात होत्या. आणि विशेष म्हणजे त्या 12 बसेसचा टोल भरला होता. सध्या तीनच बस सुरू असून टप्प्याटप्प्याने पुढील बसेस सुरू करणार आहे, पूर्ण क्षमतेने बसेस सुरू झाल्यानंतर असलेला टोल आणि आगाऊ रक्कम भरली जाईल असे सांगूनही आमच्या बस टोलवरच आडवल्या आहेत, आणि हे चुकीचे असून मूजोरीपणाचे लक्षणे आहेत, असे पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे आणि वाहतूक निरीक्षक हरिदास कोंडे यांनी सांगितले.
“टोलवरून कोणतेही वाहन मोफत सोडले जाणार नाही, जर पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळ बसेसला वाहतूक करायची असेल तर त्यांनी पैसे भरूनच टोल पास करावा.”
– आर. अनिलसिंह (अधिकारी, रिलायन्स इन्फ्रा)