कोलकाता – पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्रिशंकु स्थिती निर्माण झाली तर कॉंग्रेस व डाव्या आघाडी कडून ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याची शक्यता कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की सरकार स्थापन करण्यास जागा कमी पडल्यातर ममता बॅनर्जीं व भाजपची आघाडी होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यांच्यातच साटेलोटे आहे.
ते म्हणाले की भाजपने बंगाल मध्ये जातीयवादी राजकारण सुरू केले आहे. त्याला ममतांच्या जातीयवादी भूमिकेमुळे खतपाणीच मिळाले आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी आज पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या आधीही ममता बॅनर्जी एनडीएत सामिल होत्या. त्यामुळे त्या भाजपच्या जुन्या मित्र आहेत त्यामुळे हे दोन्ही पक्षच पुन्हा सत्तेसाठी राज्यात एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे. ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मागितला आहे.
याचाच अर्थ त्यांनी सोनिया गांधी यांच्या पुढे आधीच शरणांगती पत्करली आहे असे ते म्हणाले. ममतांनी गेल्या दहा वर्षात पद्धतशीरपणे कॉंग्रेस संपण्याचा प्रयत्न केला आहे. पण दुर्देव असे की आज त्यांनाच सोनियांकडे पत्राद्वारे मदत मागावी लागत आहे. जी कॉंग्रेस त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या दारात त्यांना जावे लागले आहे हा काळाचा महिमा आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली. तृणमुल कॉंग्रेसचे राजकीय चारित्र्य आम्ही ओळखून आहोत. बंगाल मध्ये भाजप आणि तृणमुलची विश्वासार्हता संपली असल्याने आमचा संयुक्त मोर्चा येथे सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला. राज्यातील निवडणुक ही भाजप किंवा तृणमुल कॉंग्रेस अशी दुरंगी नाहीं तर ती तिरंगी आहे. आम्हाला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे असेही चौधरी यांनी नमूद केले.