नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा जे काही म्हणाल्या ते चुकीचेच होते. त्याचे कोणी समर्थन करू शकत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की त्यावरून तुम्ही लोकांचे गळे कापत सुटावे. कोणी आपले मत मांडणे किंवा बोलणे दहशतवाद नाही. मात्र लोकांचे गळे कापणे हा दहशतवाद आहे, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.
नक्वी म्हणाले की, शर्मा यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करत नाही. पण त्याचा अर्थ कोणीही कोणाचा गळा कापावा असा नाही. हे कोणतेही इस्लामिक राष्ट्र नाही. हा भारत देश आहे आणि हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
काही आठवड्यांपूर्वी संपूर्ण देशातले व विशेषत: कर्नाटकातले वातावरण ढवळून काढणाऱ्या हिजाब प्रकरणाचा उल्लेख नक्वी यांनी केला आणि हिजाबवरून झालेला हॉरर हंगामा तुम्ही विसरलात का, असा सवाल त्यांनी केला. हिजाब प्रकरण आले की सगळ्यांत प्रथम अल कायदा त्यात उडी घेते. त्यानंतर तालिबान त्यात उडी घेतात.
आपल्या देशातल्या सगळ्यांत जुन्या पक्षाचे दोन नेते त्याबद्दल बोलतात. मग आपला देशही या हंगाम्यात सहभागी होतो. कोणी बिकिनी घालावी अथवा अन्य काही असे हे नेते म्हणतात. सरकारने विकासात कोणताही भेदभाव केला नाही असा दावा करत ते म्हणाले त्यामुळेच आम्ही येथे आहोत.
सरकारच्या आठ वर्षांच्या कारकीर्दीबाबत बोलायचे म्हटले तर धार्मिक दंगलीच्या घटना अगदी नगण्य घडल्या आहेत. काश्मिरमधील काही घटना सोडल्या तर कोठेही दहशतवादाच्या घटना घडल्या नाहीत. पूर्वी कधी कोलकात्यात हल्ला व्हायचा, तर कधी मुंबईत तर कधी हैदराबादला तर कधी अजमेर शरीफमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे.
दर महिना दीड महिन्यांनी कुठेतरी स्फोटाची अथवा हल्ल्याची घटना घडायची आणि त्यात शेकडो निरपराध लोक मृत्युमुखी पडायचे. पण आता गेल्या आठ वर्षांत वातावरण एकदम शांत आणि सौहार्दाचे आहे व हेच मोदी विरोधकांच्या अस्वस्थतेचे कारण आहे.
मोदी विरोधाचे हे वातावरण केवळ भारतातच नाही, तर भारताच्या आसपास देखिल आहे. भारतात काही घटना घडली की हे लोक अगदी अल कायदासुध्दा त्यावर बोलते याकडे नक्वी यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की 2014 नंतर ज्यांनी ज्यांनी राजकीय मात खाल्ली आहे ते एक दिवसही स्वस्थ बसलेले नाहीत.
मोदींना जनादेश मिळतो आहे मात्र त्यांच्या विरोधकांचा मोदी विरोध हा भारतविरोधाच्या कारस्थानापर्यंत पोहोचला आहे. त्यातून जगभरात चिठ्ठ्या लिहिल्या जातात की भारतात अजिबात सहिष्णुता नाही. हा अगदी असहिष्णू देश आहे, अत्यंत असुक्षित देश आहे.