उच्च शिक्षित तरुणांकडून कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना
निखील जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळ, डाळींब आणि अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. स्थानिक बाजारपेठे सोबतच आता जागतिक बाजारपेठेतही पुरंदरचा कृषीमाल अधिराज्य गाजवताना दिसत आहे. तर पुरंदरमधील प्रगतिशील शेतकऱ्यांनी विविध उद्योगांच्या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जगावर राज्य सुरुवात केली आहे. पुरंदरमध्ये सीजन नुसार सीताफळ रबडी, अंजीर रबडी, जांभूळ पल्प, पेरू पल्प, स्ट्रॉबेरी गर काढणे, आंबा गर काढणे, चिकू गर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालावर फळप्रक्रिया करून तो माल कोल्डस्टोरेजमध्ये ठेवून ऑर्डर प्रमाणे जागतिक बाजारपेठेत विक्री केली जात आहे.
पुरंदर तालुक्यातील दिवे आणि सोनोरी गावच्या तरुणांनी एकत्र येत मागील दोन वर्षांपूर्वी ऑरगॅनोबाईट फार्मर प्रोड्यूसर कंपनी या नावे कंपनी स्थापन केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषीमाल खरेदी करून त्याचा पल्प किंवा स्लाईस बनवून ते जागतिक बाजारपेठेत विक्री करतात. आणि त्यास पुरंदरचा शेतमाल असल्याकारणाने अधिकचे दरही मिळत आहेत. कृषी पदवीधर (इील.सुशील पोपट झेंडे आणि बी.कॉम. पदवी घेतलेले अक्षय गोकुळ कामथे आणि इतर पाच संचालक यांच्या संकल्पनेतून ही कंपनी स्थापन करण्यात आली. दिवे (ता.पुरंदर) येथे असलेल्या कंपनीमध्ये 35 कामगार रोज काम करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नोकरीच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ऑरगॅनोबाईट फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल त्यामध्ये प्रामुख्याने, सीताफळ, आंबा, पेरू, अंजीर, स्ट्रॉबेरी, जांभूळ, डाळींब, पपई, वाटाणा, चिकू यांची खरेदी करुन त्यांचे पल्प आणि स्लाईस या कंपनीमध्ये बनविले जातात. आकर्षक पॅकिंग आणि उत्कृष्ट क्वालिटीमुळे स्थानिक बाजारपेठे सोबतच जगभरातील बाजारपेठेत त्यांच्या मालाला मागणी आहे. पुणे, मुंबई, इंदोर यासोबतच इतर बाहेरील देशात ते पल्प आणि स्लाईस पाठवितात.
कंपनीची आर्थिक उलाढाल जवळपास वार्षिक दीड कोटी रुपये आहे. त्यामुळे या तरुणांनी समोर येत प्रगतशील शेती सोबत प्रगतशील शेतकरी घडवण्याचा निर्धार केला आहे. पुढे जाऊन अंजिरापासून विविध पदार्थ त्यामध्ये जाम व जेली आणि इतर पदार्थ बनविणार असल्याची माहिती सुशील झेंडे यांनी दिली.
बांधावर जात मार्गदर्शन
सुशील झेंडे यांच्या मुक्ताई ऍग्रो सर्विसेस दिवे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते, तर लागवडीपासून उत्पन्न मिळेपर्यंत आणि कृषी मालक खरेदीकरे पर्यंतची जबाबदारी या फार्मर प्रोड्यूसर कंपनी मार्फत उचलली जाते.
जीआय मानांकन
पुरंदरमधील अंजिराला जी आय मानांकन मिळाल्यामुळे येथील अंजिराला आणि त्याच्या बनवलेल्या पदार्थांना विशेष मागणी बाजारपेठेत आहे.
उच्चशिक्षित तरुणांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये उतरले पाहिजे. शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून जागतिक बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल जास्त बाजार भावाने विकण्यासाठी सक्रिय राहिले पाहिजे. त्यातूनच शेतकरी प्रगतिशील होईल.
– सुशील झेंडे, ऑरगॅनोबाईट फार्मर प्रोड्युसर कंपनी