कुरकुंभपाठोपाठ पुरंदर रडारवर : कारवाईची व्याप्ती वाढविण्याची गरज
पुणे – औद्योगिक वसाहतींची ओळख असलेला पुणे जिल्हा आता अंमली पदार्थांची तस्करी आणि साठा आदी कारणामुळे चर्चेत आला आहे. दौंडपाठोपाठ पुरंदर तालुकाही अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. जिल्ह्यात मोठे रॅकेट असल्याचे यानिमित्त “अधोरेखित’ झाले आहे. ग्रामीण भागात बस्तान बसवून देशात अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. हे अड्डे दहशतवादी विरोधी पथकाने उध्द्वस्त केले आहे. मात्र, याची व्याप्ती तळागाळात पोहोचली असल्याचे उघड झाले आहे.
दिवेतील गावकरी सुन्न
दिवे गावात 85 कोटी रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पुरंदर तालुक्यात पसरली. ही वार्ता समजताच गावकरी सुन्न झाले. घाटावरील दिवे गावात ही मोठी कारवाई गावकऱ्यांसाठी अस्थवस्थ करणारी ठरली. शेती आणि अन्य प्रशासकीय सेवेत अग्रेसर असलेल्या दिवे गावातील कारवाई झाल्याचे समजताच नागरिक खासगीत आणि दबक्या आवाजात चर्चा करू लागले.
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्या कार्यरत आहेत. यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सौंदर्य प्रसाधने, अन्य केमिकल कंपन्या थाटल्या आहेत. यातील अनेक कंपन्या उत्पादनाच्या गोंडस नावाखाली खुलेआमपणे अंमली पदार्थांची निर्मिती करीत असल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यावर दोन वर्षांपूर्वी कारवाई केली होती. त्यावेळी संबंधित कंपनीवर धाड टाकल्यानंतर पुणे (हडपसर) येथील कार्यालयातून कागदपत्रे आणि अन्य मुद्देमाल जप्त केला होता.
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मेफाड्रोनची किंमत कोटींच्या घरात आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये रॅकेट असल्याचे उघड झाल्यानंतर मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरंदर तालुक्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाने दिवे घाटाच्या वरील बाजूस गोडावून भाड्याने घेतले. यात केमिकल उत्पादनाच्या नावाखाली अंमली पदार्थाची निर्मिती करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.
पुणे शहराच्या उंबरठ्यावर आलेल्या दिवे गावात दहा ते पंधरा कंपन्या आहेत. यात काही गोडाऊनचा समावेश आहे. शहराजवळ असलेल्या दिवे गावात नागरिकांनी व्यावसायिक आणि उद्योजकांना जागा भाड्याने दिली आहे. दिवेतील याच गोडाऊनमधून आरोपी संतोष आडके हा अंमली पदार्थाची निर्मिती करीत होता. त्यातून हे ड्रग्ज मुंबई, पुणे शहरासह परराज्यात विक्रीस पाठविले जात होते.
एटीएस पथकाने कारवाई केल्यानंतर आरोपींकडून या प्रकरणातील आणखी मोठे रॅकेट उघड होणार आहे. पथकाच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेटमधील आणखी मोठे मोहरे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे. दिवसाकाठी कोट्यवधींची कमाई करणाऱ्या माफियांनी पुरंदर तालुक्यासह जिल्ह्यात बस्तान बसविले आहे. याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे. तरच जिल्हा अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त होणार आहे.; अन्यथा दर दोन ते तीन वर्षांनी आणखी दुसरा माफिया बस्तान बसविण्यासाठी सक्रिय होईल.
वाहतूक आणि दळणवळणासाठी सोयीस्कर
दिवे गावातील अंमली पदार्थाचा साठा असलेले गोडाऊन वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर होते. त्यात पुणे, मुंबई शहरात जाण्यासाठी गैरसोय होत नव्हती. ड्रग्ज माफियांनी याचा सारासार विचार करूनच दिवे गावात अंमली पदार्थांच्या निर्मितीचे केंद्र थाटले होते. याची पुसटशी कल्पना गावकऱ्यांना आली नाही. त्याचपाठोपाठ कर्तव्यदक्ष पोलिसांना याची कानोकानी खबर नव्हती. साध्या पत्र्याच्या शेडमधील अंमली पदार्थाचा बिनबोभाट आणि व्यसनाच्या गर्तेत ढकलणारा गोरखधंदा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू होता. मुंबईतील कारवाईच्या आधारे एटीएस पथकाने दिवे गावात रॅकेट असल्याची माहिती मिळविली. त्यामुळे मुंबई “कनेक्शन’मुळे दिवे गावातील अंमली पदार्थांचा अड्डा उध्द्वस्त केला.