जालंधर – पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवा पंजाब हा भरपूर संधींचा आणि कर्जमुक्त असेल, असा दावाही त्यांनी आज जालंधरमध्ये झालेल्या प्रचार सभेला संबोधित करताना व्यक्त केला.
“पंजाबमध्ये “एनडीए’चे सरकार येणार हे निश्चित आहे. पंजाबच्या नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही आहोत.’ असे मोदी म्हणाले. नवीन पंजाब अस्तित्वात आल्यावरच नवीन भारत अस्तित्वात येईल. या नव्या पंजाबमध्ये संस्कृती आणि विकासाचा समन्वय असेल. नव्या पंजाबमध्ये प्रत्येक दलित बंधू आणि भगिनीला मान मिळेल. प्रत्येक पातळीवर योग्य सहभाग असेल, असे पंतप्रधान म्हणाले.
कॉंग्रेस पार्टी विघटन करते आहे. जे आपापसातच भांडत असतात, ते पंजाबला स्थिर सरकार देऊ शकणार नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी गांभीर्याने काम करणारे सरकार पंजाबमध्ये हवे आहे. कॉंग्रेस कधीही पंजाबसाठी काम करू शकत नाही, असा इतिहास आहे. जो काम करतो, त्याच्या वाटेत कॉंग्रेस अडथळे निर्माण करते. पंजाबमधील व्यापार आणि उद्योग माफियांच्या हातात आहे, असा आरोपही पंतप्रदानांनी केला. पंजाबमध्ये खते आणि कीटकनाशके जागतिक किंमतींपेक्षा अल्प दराने उपलब्ध करून दिली जातात. आता नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीवरही भर दिला जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.