पुणे –भारताने 1971 मध्ये मिळवलेला विजय हा पहिला सर्वांत मोठा व निर्णायक होता. त्यानिमित्ताने आबा बागुल यांनी अंगावर शहारे आणणारा आणि आगळावेगळा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाद्वारे तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होईल आणि सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयास 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित या युद्धावर आधारित थ्रीडी मल्टिमीडिया लेझर चित्रफित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त), कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), कर्नल पी. के. बत्रा (निवृत्त), कर्नल सदानंद साळुंखे (निवृत्त), कर्नल सुहास नेने (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व सैन्यदलातील अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महापालिका कॉंग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून व पुणे महापालिकेच्या सहयोगातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपमहापौर सुनीता वाडेकर, महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अ. भा. कॉंग्रेसच्या सचिव सोनल पटेल, राज्य महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे, शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, राजकीय विश्लेषक तेहसीन पूनावाला, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवदर्शन परिसरातील कै. वसंतराव बागुल उद्यानात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी देशाचे रक्षण करताना शहीद झालेले जवान आणि नुकतेच अपघातात निधन पावलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांच्या सोबतच्या जवानांना श्रद्धांजली व मानवंदना अर्पण करण्यात आली. तसेच, 1971च्या भारत-पाक युद्धाच्या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान इंदिरा गांधी, तेव्हाचे जनरल सॅम माणेकशॉ यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर या कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर बटण दाबून थ्रीडी मल्टीमीडिया लेझर चित्रफितीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले.
वीस मिनिटांची ही चित्रफीत दाखविली गेल्यानंतर गटनेते आबा बागुल यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आपल्या देशाचा इतिहास व संरक्षण दलाचे रोमहर्षक विजय याची माहिती या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही चित्रफीत पालिकेतर्फे कै. वसंतराव बागुल उद्यानात दररोज सायंकाळी दाखवली जाणार असल्याचे बागुल यांनी सांगितले.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, इतिहास जिवंत करण्याचे काम या पाण्यावरील थ्रीडी शोच्या माध्यमातून झाले आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे. ते काम आज आबा बागुल महापालिकेच्या माध्यमातून करत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले.