आंबेगाव बुद्रुक – पुणे महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रश्न मांडताना नागरिकांना अडचणी येत आहेत. आता, पावसाळा येत असताना नाल्यांची सफाई करणे गरजेचे असताना नालेसफाईची कामे सुरू करण्याकरीता निविदा काढणे गरजेचे आहे. परंतु, आंबेगाव परिसरासह पालिकेत समाविष्ट गावांतील ओढ्यानाल्यांच्या सफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
जांभुळवाडी तलाव परिसरात 13 वर्षांपूर्वी शासनाचा विशेष योजनेतून तत्कालीन नगरसेवकांनी ओढ्याची डागडुजी तसेच सफाईचे काम मोठ्या प्रमाणात केले होते, त्यानंतर आज अखेर कोणत्याही उपाययोजना याबाबत करण्यात आली नसल्याने या ओढ्याची दुरवस्था झाली आहे.
जांभुळवाडी तलावापासून वाहणारा ओढा आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, नऱ्हे वडगाव मार्गे नदीला मिळतो. सदर ओढा तलावातील पाणी व कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहतो. परंतु, गेल्या कित्येक वर्षात या ओढ्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. आंबेगाव भागातून वाहणाऱ्या या ओढ्यावर कोठेही संरक्षण कठडे नाहीत, यामुळे ओढ्याचे पाणी पावसाळ्यात पात्राबाहेर येते. त्यामुळे ओढ्याच्या स्वच्छतेसह संरक्षक भिंतीचे काम होणेही गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी सामविष्ट गावांसह आंबेगावमधील ओढ्याची साफसफाई करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन तीन ते चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. परंतु, येथील या मुख्य समस्येकडेच पालिकेचे दुर्लक्ष आहे.