यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांचे प्रतिपादन
पुणे – मेट्रो प्रकल्प हा केवळ विशिष्ट शहराच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या प्रगतीमध्ये लक्षणीय हातभार लावणारा असतो. त्यातच पुणे हे देशविदेशातील विद्यार्थ्यांसाठी प्रमुख महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून आकाराला आलेले असल्याने येथील विद्यार्थ्यांना वेगवान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त परिवहन मिळवून देणारी मेट्रो रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 ही विद्यापीठालादेखील जोडणारी असल्याने तिचे आणखी आगळे महत्त्व आहे, असे मत यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
तसेच प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनात पाठबळ मिळावे दृष्टीने पुणे मेट्रो लाईन 3 च्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार अवश्य करावा, असे आवाहनही चोकलिंगम यांनी यावेळी पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडला केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3 च्या वतीने रविवारी ताथवडे कास्टींग यार्ड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चोक्कलिंगम बोलत होते.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी स्थापित विशेष उद्देश कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते. यावेळी चोक्कलिंगम, दिवसे आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडीत, प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांनी उंबर, वड आदी झाडांचे वृक्षारोपण केले.