पुणे – महापालिकेच्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या धरणावरील मुख्य जॅकवेलचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने बुधवारी या प्रकल्पातून केला जाणारा नगर रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. त्याचा, फटका तब्बल दहा लाख पुणेकरांना बसला.
भामा-आसखेड धरणातून शहरासाठी पाणी उचलण्यासाठी करंज विहिरे गावात जॅकवेल बसविण्यात आला आहे. या ठिकाणी वीज पुरवठ्याचे सब स्टेशन आहे. सब स्टेशन ते जॅकवेल पर्यंतच्या दिड किलोमीटर अंतरात भूमीगत वीज वाहिनीत सकाळी १०:३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत केबलचा बिघाड शोधण्यात वेळ गेला. दुरूस्तीचे काम पहाटे पर्यंत चालण्याची शक्यता असल्याने उद्या ( गुरूवारी) पाणी पुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होणार आहे.
भामा- आसखेड प्रकल्पातून महापालिकेसाठी वर्षाला २.६२ टीएमसी पाणीसाठा मंजूर असून महापालिकेस प्रतीदिन २०० एमएलडी पाणी उलचण्याची मुभा आहे. मात्र, महापालिका दिवसाला १४५ एमएलडी पाणी उचलत आहे. यासाठीचा जॅकवेल महापालिकेकडून करंजविहिरे येथे बसविण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्र सब स्टेशन उभारण्यात आला आहे. हे सब स्टेशन ते जँकवेलपर्यंत दिड किलोमीटरची वीज वाहीनी आहे.
तर दुसरा बिघाड चाकण येथून करंज विहिरे सब स्टेशनला केल्या जाणार्या वीज पुरवठ्यात झाला आहे. हे दोन्ही बिघाड सकाळी १०:०० नंतर झाल्याने भामा-आसखेड धरणातून पाणी पुरवठा केल्या जाणार्या येरवडा, कळस, विश्रांतवाडी, धानोरी, टिंगरेनगर, लोहगाव, खराडी, नगर रस्ता, वडगावशेरी, मुंढवा काही भाग, विमाननगर, चंदननगर, येरवडयाचा काही भाग या भागातील नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.
“आमच्या भागात दुपारी पाणी येते. मात्र, बुधवारी पाणी येणार नसल्याची कोणतीही कल्पना नव्हती. सायंकाळी उशीरा पर्यंत पाणी न आल्याने महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना संपर्क साधला असता थोडया वेळात पाणी येइल असे सांगण्यात आले, त्यानंतर आत उद्याच पाणी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.” – मंजूषा जाधव, गृहीणी, धानोरी