पुणे – सनईचे सूर आणि गायकांच्या सुरेल सुरावटींनी ६९ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’ ला बुधवारी प्रारंभ झाला. काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा महोत्सवाची सुरूवात सनईच्या सुरांनी झाली. तुकाराम दैठणकर यांनी राग मधुवंतीने सुरवात केली आणि महोत्सवाचे उद्घाटन झाले.
सनईच्या स्वरावलींतून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. त्यांना तबला – कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी – गणेश दैठणकर, तानपुरा – केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. ‘वैष्णव जन तो’ या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली. यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलासमधील ‘अब तो बडी देर’ या रचनेतून केली. त्यानंतर त्रितालात ‘बीरज मे धूम मचाए शाम’ ही प्रसिद्ध बंदिश म्हटली.
‘माझे माहेर पंढरी’ या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी सांगता केली. यावेळी भक्तीमय वातावरण निर्माण झाले. त्यांना संवादिनी शांतीभूषण देशपांडे, तबला रोहन पंढरपूरकर, तानपुरा – प्रसाद कुलकर्णी आणि ऋत्विक हिर्लेकर, पखवाज माऊली फाटक, सारंगी फारुख लतिफ खान तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली. ‘सवाई’ च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी कुमारजींच्याच दोन रचना पेश करून आपला गायनातील समृद्ध वारशाचे दर्शन रसिकांना घडवले. ‘आजरा दिन डूबा’ आणि ‘ मृगनयनी तेरो यार री’ ही रचना त्यांनी पेश केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली ‘सुनता है गुरु ग्यानी’ ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली.