पुणे : नाना पेठेत वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह साथीदारांना सहा जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर (वय ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय ३३), तुषार निलंजय वाडेकर (वय २४), स्वराज निलंजय वाडेकर (वय २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय २७) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाना पेठेत बंडू आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे. ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे, अनिकेत दुधभाते मित्र आहेत. सोमवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आखाडे आणि दुधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. त्यावेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले होते.
उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ माने आणि पथकाने पसार झालेल्या आरोपींना अटक केली.