पुणे – राज्यांत यंदा कमी झालेले पाऊसमान आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे तुरीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. याचा परिणाम म्हणून तुरीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी नऊ ते साडेनऊ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. ही स्थिती कायम राहिली, तर येत्या काळात तूर डाळीचे भाव कडाडण्याची चिन्हे आहेत.
साधारणपणे डिसेंबर-जानेवारीत तुरीचे पीक काढणीनंतर बाजारात येणे सुरू होते. राज्यात प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात तुरीचे पीक प्राध्यान्याने घेतले जाते. कोरडवाहू जमीन आणि समशितोष्ण वातावरणामुळे या पिकाला चांगला बहार येतो. विशेषत: बाजारात तुरीला मिळणाऱ्या दराचा अंदाज घेऊन मराठवाड्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने उत्पादन आणत आहेत.
तर, विदर्भातील तूर पुढील पंधरवड्यात दाखल होण्यास सुरुवात होईल. पण, उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकरी काही दिवस तुरीचा माल घरातच ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे सध्या असलेले भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, यंदा कमी पावसामुळे तुरीचे पीक चांगल्या प्रमाणात भरले नाही. त्यामुळे दरक्विंटल तुरीपासून सरासरी ६० ते ७० किलो डाळ मिळत आहे. हा उतारा सरासरीपेक्षा कमी आहे, असे निरीक्षण शेतकरी आणि व्यापारी नोंदवत आहेत.
अवकाळी पावसाचा फटका
मराठवाड्याच्या बहुतेक भागात तुरीच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे पीक आडवे झाले. यात तूर भिजल्यामुळे तिचा दर्जा घसरला. पण, चांगल्या दर्जाच्या उत्पादनाला सध्या नऊ हजार ते साडेनऊ हजार रु. प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.