पुणे : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली. यावेळी रस्त्यावरील खड्डे, ठिकठिकाणी पडलेली वाळू आणि अस्ताव्यस्त बॅरिकेटसंदर्भात त्यांनी महापालिका आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी किती दिवसांत ही डागडुजी करणार? असा सवाल अधिकाऱ्यांना केला. त्यांचा रुद्रवतार पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.
मेट्रो आणि उड्डणपुलाच्या कामामुळे विद्यापीठ चौकात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. याचे खापर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात वाहतूक शाखेवर फोडले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन खुद्द पोलीस आयुक्तांनीच विद्यापीठ चौकात भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ चौक, बाणेर, पाषाण आणि सुस रोडची पाहणी केली. रत्स्यावर पडलेली अस्ताव्यस्थ खडी आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना करावी लागलेली कसरत पाहून आयुक्तांचा पारा चढला. याप्रकरणी त्यांनी कडक शब्दांत महापालिका अधिकारी आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
खड्डे, खडी आणि अस्ताव्यस्त बॅरिकेटसमुळे वाहतूक संथ होऊन कोंडीत भर पडत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही कामे किती दिवसांत करणार? असा खडा सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या रागाचा पारा पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक उपायुक्त शशिकांत बोराटे उपस्थित होते.