पुणे -भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमधील लाकडाच्या गोडाऊनला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग तब्बल आठ तास धुमसत होती. यामध्ये मधुर ट्रेडर्स-राहुल संघवी, वर्धमान एंटरप्रायजेस-प्रकाश मुथा, नतमल मुलाजी ओसवाल, अशोक ओसवाल, नॅशनल टिंबर-लालचन ओसवाल, मनोज टिंबर्स-बाळासाहेब ओसवाल, गुलाब टिंबर्स-गुलाब ओसवाल यांच्या वखारी जळाल्या तसेच आजूबाजूच्या 13 घरांचे आणि एका बंगल्याचे नुकसान झाले आहे. टिंबर मार्केटच्या मागील बाजूस महापालिकेची रफी अहमद किडवाई उर्दू शाळेलाही आगीची झळ बसली आहे. आग इतकी भीषण होती की काही किलोमीटर परिसरातूनही आगीच्या प्रचंड ज्वाला दिसत होत्या. आगीचे रौद्र रुप लक्षात घेऊन अग्निशमन दल प्रमुखांनी ब्रिगेड कॉल दिला होता. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या, 20 अधिकाऱ्यांसह 125 जवान आग आटोक्यात आणण्याचे तसेच कुलींगचे काम सायंकाळी उशीरापर्यंत करीत होते. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी धाव घेत वाचलेला माल शाळेच्या बाजूने बाहेर काढण्यास सुरवात केली. या आगीची झळ बसलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. टिंबरमार्केटजवळ मोठी लोकवस्ती आहे, सुदैवाने आग वस्तीपर्यंत पोहचली नाही.
तब्बल आठ तास धुमसत होती आग
अग्निशमन जवान पहाटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीने रौद्र रुप धारण केले असल्याने शेजारील शाळा व काही घरांना होणारा धोका लक्षात घेत जवानांनी तातडीने गोडाऊनच्या शेजारील असलेल्या घरांतील दहा सिलिंडर बाहेर काढून सुरक्षीत ठिकाणी नेले. वस्तीतील नागरिकांनाही सुरक्षीत ठिकाणी नेण्यात आले. गोडाऊन लाकडी पट्ट्यांनी खच्चून भरले होते. यामुळे आग वेगाने पसरत होती. वखारींचे पत्रे गरम होऊन विरघळून खली पडत असल्याने यातून आगीच्या प्रचंड ज्वाला सर्वत्र पोहचल होत्या. यामुळे आग पसरून नियंत्रणास आणण्यास शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. कुलिंगचे काम सायंकाळ उशीरापर्यंत होते सुरू होते.
फायर ऑडिट करण्याची गरज…
टिंबर मार्केटमधील दुकाने दाटीवाटीने वसलेली आहेत. येथे मोठ्या प्रमाणात लाकडाचा माल भरलेला आहे. बहुतांश गोडाऊन पत्र्याची आहेत, त्यांचे वायरिंगची जेमतेम आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या सहज पोहचतील, अशी सोय नाही. शेजारील शाळेच्या ग्राउंडवर गाड्या उभ्या करता आल्याने आग विझवणे सोयीचे झाले. मात्र, इतरत्र मार्केटमध्ये आग लागल्यास अग्निशमन दलापुढे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
करोनानंतर बाजार सावरत होता…
करोनामुळे दोन-तीन वर्षे टिंबर मार्केट ठप्प होते. बांधकाम व्यवसायावर येथील उलाढाल अवलंबून असते. बांधकाम व्यवसायाने करोनानंतर वेग घेतल्याने टिंबर मार्केटमधील उलाढालही वाढली होती. मात्र, आगीमध्ये गोडाऊनमधील सर्वच्या सर्व माल खाक झाला. यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या आर्थिक धक्क्यातून सावरण्यास बराच काळ जाणार आहे. यामुळे आमचा आर्थिक कणाच मोडला असल्याचे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले.
आगीचा कॉल सव्वाचारच्या सुमारास आल्यावर तातडीने घटनास्थळी वाहने पाठवण्यात आली. दाट वस्ती असल्याने ब्रिगेड कॉल देण्यात आला. वखारी एकमेकांलगत आणि दाट वस्तीत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. आम्ही सर्व प्रथम वखारींचे पत्रे बाजूला काढून पाण्याचा मारा सुरू केला. सकाळी दहापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, दुपारी तीनपर्यंत आगीच्या ज्वाळा अधूनमधून धुमसत होत्या.
– देवेंद्र पोटफोडे,मुख्य अग्निशमन अधिकारी
मी बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी गेलो होतो. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मला टिंबर मार्केटमधील नागरिकांनी कॉल करून आग लागल्याचे सांगितले. मी तातडीने टिंबर मार्केटला पोहोचलो. तेथे माझ्या दुकानातून आगीचे प्रचंड लोट येताना दिसले. समोरचे दृश्य पाहून मला धक्का बसला. मी मागील 30 वर्षांपासून ही पिढीजात वखार चालवत आहे. ही दुर्घटना असेल, कोणी जाणूनबुजून असे करणार नाही.
– प्रकाश मुथा,मालक, वर्धमान एंटरप्रायजेस
2005 नंतरचा दुसरा ब्रिगेड कॉल…
भवानी पेठेतीलच कासेवाडीमध्ये मार्च 2005 मध्ये भीषण आग लागली होती. यामध्ये तब्बल 500 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. तेव्हा अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी ब्रिगेड कॉल दिला होता. ब्रिगेड कॉल म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या व जवळपासच्या सर्व केंद्रांतील अग्निशमन वाहनांना घटनास्थळी धाव घेण्याचा आदेश असतो. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी घटनास्थळीची परिस्थिती लक्षात घेत गुरुवारी ब्रिगेड कॉल दिला. यामध्ये त्यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी व जवळपास 100 जवान आणि पुणे महापालिका- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाची अशी एकूण जवळपास 30 अग्निशमन वाहने व खासगी वॉटर टॅंकर दाखल झाले होते.
85 ते 90 टॅंकर पाण्याचा वापर
टिंबर मार्केटमधील आग नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 85 ते 90 टॅंकर पाणी लागले. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी शहरात पाणीपुरवठा बंद असल्याने महापालिकेचे सर्व टॅंकर पॉईंट बंद होते, त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांमधील पाणी संपल्यानंतर पंप लावून नवीन मुठा उजवा कालव्यातून टॅंकर भरण्यात आले. तर, आगीची माहिती पाणीपुरवठा विभागास मिळाल्यानंतर तातडीने पद्मावती येथील टॅंकर पॉईंट सुरू करण्यात आला. त्यामुळे, आग नियंत्रणात आणण्यास मोठी मदत झाली. मात्र, या निमित्ताने आपत्तीच्या काळासाठी शहरात अशा संवेदनशील ठिकाणी फायर हायड्रंट बसविण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घटनास्थळी दुपारच्या सुमारास भेट दिली. तसेच, घटनेची माहिती घेऊन तातडीने आवश्यक ती खबरदारी घेण्यासह, महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या.