पुणे – राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे. पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन आणि थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले असून, पहाटे कमालीचा गारठा जाणवत आहे.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर अनेक भागांत किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे.
राज्यात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील बहुतांश भागात बुधवारीही पावसाने हजेरी लावली. कोकणात आणि खासकरुन रत्नागिरीमध्ये पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये ७.८ मीमी पावसाची नोंद झाली. या शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. विदर्भ, अकोल्यात ०.२ तर नागुपरात ०.३ मीमी पावसाची नोंद झाली. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसून आले.