डॉ. सचिन नगरकर; वयाच्या तिशीतही होऊ शकतो आजार
पुणे -जगात प्रत्येकी तीन सेकंदाला स्मृतिभ्रंशाच्या (डिमेन्शिया) एका रुग्णाचे निदान होते. आता यालाही वयाचे बंधन राहिले नसून, तिशीतही हा आजार होऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ. सचिन नगरकर यांनी व्यक्त केले.
“रोटरी क्लब ऑफ पूना मिड टाऊन’ तर्फे डॉ. नगरकर यांचे “स्मृतीभ्रंशाचे मानसिक खेळ’ या विषयावर गुरूवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रोटरीचे प्रेसिडेंट पराग सुरा, सचिव सूरज पाषाणकर उपस्थित होते.
स्मृतीभ्रंशाची सुरूवात ही बहुतांशवेळा निदान होण्याआधी 15 वर्षांपासून सुरू होते. माणसाने जगणे वाढवले (आयुर्मान) परंतु, त्याप्रमाणे जगण्याच्या क्वालिटी वाढवल्या नाहीत. स्मृतीभ्रंश टाळायचा असेल तर त्याची जागरूकता वयाच्या 25व्या वर्षापासूनच असली पाहिजे, असे डॉ. नगरकर म्हणाले.
स्मृतीभ्रंशावर अद्यापपर्यंत एकाही औषधाची चाचणी यशस्वी झालेली नाही. त्यामुळे यावर ठोस असे उपचार नाहीत. परंतु, योग्य वयात, योग्य काळजी घेतली तर हा आजार टाळता येऊ शकतो आणि सुरूवातीच्या काळातच योग्य उपचार केले तर नियंत्रणात राहू शकतो, असे डॉ. नगरकर यांनी सांगितले. या रोगापासून लांब रहायचे असेल तर डाएट कंट्रोल, फॅट्स खाणे सोडून देणे. समतोल आहारात तूप आदीचा समावेश असावा, भरपूर पाणी पिणे, व्यायाम करणे तेही खेळाच्या माध्यमातून असलेला व्यायाम असावा, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे अपेक्षित नाही, असे डॉ. नगरकर यांनी नमूद केले. सच्चीदानंद रानडे यांनी आभार मानले.
‘अल्जायमर’ : कमी होऊ शकत नाही…
‘डिमेन्शिया’मधील काही आजार बरे होऊ शकतात. परंतु, त्यातीलच “अल्जायमर’ हा उपप्रकार आहे तो मात्र कमी होऊ शकत नाही. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक क्षती होतेच. अशा रुग्णांना “डायपर’, “ड्रग’ (औषधे), डाएट आणि डॉक्टर एवढ्या “डी’ ची आवश्यकता नसते तर त्यांना “अटेंशन’ची गरज असते. त्यामुळे त्यांना संस्थांमध्ये दाखल करणे कधीही फायद्याचे असते. “पार्किन्सन्स’ हा देखील त्याचाच उपप्रकार आहे.
‘डिमेन्शिया’ : काहीच लक्षात राहत नाही
“डिमेन्शिया’च्या लक्षणांमध्ये कोणती गोष्ट लक्षात राहत नाही, छोट्या छोट्या गोष्टींचे विस्मरण होते. रोजच्या गोष्टीही विसरणे, रोज करतो ते कामही करता येत नाही अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय विसराळूपणा, एखाद्या कामातील, व्यक्तीतील, गोष्टीतील इंटरेस्ट जायला लागतो, परफॉर्मन्स जातो, स्मृती जाऊ लागते, लघवी, शौचावरचे नियंत्रण जाते, अन्न गिळताना त्रास होतो, अशी अनेक लक्षणे यात दिसतात.