पुणे- राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अपडेशनेचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. या कामकाजाची विशेष समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे.
2021-22 ची संच मान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संच मान्यता 30 डिसेंबर 2021 च्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे केली आहे. विद्यार्थ्यांच्या 100 टक्के आधार नोंदणी व अपडेशनचे उद्दिष्ट शालेय शिक्षण विभागाने ठेवले आहे.
|
मात्र, काही ना काही कारणास्तव विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास विलंब होत आहे. यावर काही उपाययोजना राबविण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी घेतला आहे. त्याबाबतच्या सूचनाही राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना दिल्या आहेत.
सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे 31 मार्चपर्यंत आधार अपडेट झाल्यानंतर आधाक क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. डुप्लीकेट आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा शाळास्तरावर दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी. डुप्लीकेट आधार क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी लागणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणीदेखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत.
…अशी असणार समिती
आधारबाबत पडताळणी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. शिक्षण विस्तार अधिकारी हे समितीचे प्रमुख असणार आहेत. केंद्र प्रमुख, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग अधिकारी, प्रशासन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत. अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी यांचा सदस्य असणार आहेत.