विशाल भालेराव
खडकवासला -आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठी पदे मिळण्यासाठी हवेली तीलुक्याच्या पश्चिम भागातील गावनेत्यांचा पक्ष प्रवेश जोमात सुरू आहे, तर पोकळी निर्माण झालेल्या पक्षात मात्र दंगल निर्माण झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात कोण ठरणार सत्ताधारी या चर्चेला उधाण आले आहे.
खडकवासला परिसरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपात गेले आहेत. तर भाजपच्या काहींनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. परिणामी खडकवासला मतदार संघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आपण असलेल्या पक्षात उमेदवारी मिळत नसली तर या पक्षात कशाला रहायचं म्हणून अनेक इच्छुक उमेदवार प्रमुख मंडळीच्या विचारांवर आपल्या निवडून देणाऱ्या मतदारांच्या जीवावर पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. भविष्याचे राहू दे पण आताच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळणार यासाठीही काहीजण पक्षत्याग करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आपले कार्यकर्ते सोडून गेलेल्या पक्षात मात्र दंगल निर्माण झाली आहे. जनता चांगल्या विचाराच्या पक्षा जवळच राहते, नेता म्हणजे पक्ष नव्हे, अशी चर्चाही जोरात सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता सध्या काय करणार याबाबत चर्चा सुरु आहे. खडकवासला मतदार संघात सर्वत्र राष्ट्रवादी वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे या पक्षात गेले तर विविध पदाचा लाभ होणार. तर आपल्या व्यवसायालाही धक्का पोहचू नये, म्हणून अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेशामुळे नव्यांना संधी मिळणार हे स्पष्ट असल्याने इतर पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कमालीचे दुखावले आहेत.
कोण सावरणार अन् कोण आवरणार?
जिल्हा परिषद, पंचायत समितीही राष्ट्रवादीलाच अनुकूल आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समिती खऱ्या अर्थाने अधिकाधिक विकास करायचा असेल तर राष्ट्रवादीसोबतच असलेले बरे, असे म्हणत युवक व महिलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अशा परिस्थितीत कोण सावरणार, कोण आवरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.