वडगाव मावळ -तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. नवीन मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. आठ दिवसांत हा मार्ग सुरू होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.
शुक्रवारी (दि. 4) दुपारी 2 वाजता नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मार्गाची पाहणी उपायुक्त भोईटे यांनी केली. या वेळी त्यांनी सांगितले की पुढील आठ दिवसांत नवीन मार्गाने वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या वेळी पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, विशाल गजरमल, एमएसआरडीसीए राकेश सोनवणे, कर्मचारी रमेश पोटे, आयआरबीचे उत्तम चौघुले उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय मार्गावर बेबड ओहळ, उर्से, नवलाख उंब्रे, टाकवे-कान्हे, म्हाळुंगे, चाकण आदी औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहतूक 24 तास सुरू असते. त्यातच स्थानिक नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी व पादचारी यांची वर्दळ यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. याच वाहतूक कोंडीने अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. दिवसेंदिवस या मार्गावर वाहतूक वाढत असल्याने रस्ता अरुंद झाला आहे.
त्यात एखादे अवजड वाहन नादुरुस्त होऊन मार्गात थांबते त्यामुळे तासंतास वाहतूक कोंडी वाहनचालक व नागरिकांचा श्वास गुदमरून जातो. परंतु नवीन मार्ग सुरू होणार असल्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वडगावगाव ते आंबेठाण या मार्गाची संपूर्ण पाहणी केली. आठ दिवसांत या मार्गावरून वाहतूक सुरू होणार आहे. जागोजागी वाहतुकीचे सूचना फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे तळेगाव दाभाडे-चाकण राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
– आनंद भोईटे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय.
नवीन मार्ग
स्थानिकांनी या वाहतूक कोंडीबाबत अनेकवेळा आवाज उठविला. अखेर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त भोईटे यांनी शुक्रवारी (दि. 4) येऊन वडगाव-तळेगाव दाभाडे फाटा, ते वडगाव-नवलाख उंब्रे मार्ग, शिंदे वासुली बिरदवडी मार्गे आंबेठाण असा मार्ग असणार आहे. चाकण तसेच नाशिक अशी जाणारी वाहतूक याच मार्गे वळविण्यात येणार आहे.
दिवसा अवजड वाहनांना वाहतूक बंद
दहा टायर वाहनांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाहतुकीसाठी तळेगाव दाभाडे शहरातून बंदी आहे. परंतु सायंकाळी 7 नंतर अवजड वाहने रस्त्यावर आल्याने तळेगाव परिसरात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे तळेगावकरांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी वारंवार तळेगावकरांकडून होत होती.