पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग 3 च्या कामामुळे बाणेर ते शिवाजीनगर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. या मेट्रोचे काम पीएमआरडीएकडून करण्यात येत असल्याने या रस्त्यावरील खड्डे तसेच खराब झालेल्या पदपथाची दुरुस्ती पीएमआरडीएकडून केली जाणार होती.
मात्र, रस्ते खराब झाल्यानंतर महापालिकेकडून वारंवार पत्र देऊनही पीएमआरडीएकडून पालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखविली जात असल्याने हतबल झालेल्या महापालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दुरुस्तीचा खर्च पीएमआरडीएकडून वसूल केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पाऊस थांबताच हे काम तातडीनं हाती घेतले जाणार आहे.
नागरिक, वाहतूकपोलिसांची तक्रार महामेट्रोकडून या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू केल्यानंतर मागील वर्षी पावसाळ्यात विद्यापीठ चौक ते बाणेरपर्यत रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या शिवाय, अनेक भागात पदपथांची दुरवस्था झाल्याने तसेच मेट्रोच्या बॅरीकेडमुळे पावसाळी वाहिन्या बुजल्याने रस्त्यावर अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे, महापालिकेने पीएमआरडीएसोबत झालेल्या बैठकीत हे काम पीएमआरडीएने करावे, असे सांगितले. त्यास त्यांनी होकारही दिला.
त्यानंतर काही ठिकाणी दाखविण्यापुरते काम करण्यात आले. मात्र, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रस्ता तसाच सोडण्यात आला. मात्र, खड्डे, तोडलेले दुभाजक तसेच पदपथांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढल्याने नागरिकांनी महापालिका तसेच पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर पोलिसांनीही महापालिकेस पत्र पाठवित वाहतूक कोंडी होत असल्याने तातडीनं काम करावे अन्यथा कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, तरीही पीएमआरडीए काम करत नसल्याने हतबल झालेल्या महापालिकेने बाणेर ते शिवाजीनगर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाणेर ते शिवाजीनगर या रस्त्याची जबाबदारी पीएमआरडीएकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून काम होत नसल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकाच हे काम करणार असून त्याचा खर्च पीएमआरडीएकडून वसूल केला जाणार आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका