पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव आपण मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. पण, ठरावाची अंमलबजावणी करताना काही वाईट बाबी घडल्या. जाळपोळ, मृत्यूपर्यंतच्या घटना घडल्या, अशी खंत केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. मात्र सत्तेत येताच सर्वांना विश्वासात घेऊन नामांतराचा प्रश्न कायमचा सोडविला, असेही पवार यांनी बोलून दाखविले.
ऍड. जयदेव गायकवाडलिखित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञावंताचा संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, विचारवंत डॉ. भारत पाटणकर, डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण खोरे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, “बाबासाहेब फक्त बहुजन समाजाचे नाही तर समस्त स्त्री, पुरुष, सर्व जाती धर्माचे नेते होते. जाती व्यवस्थेचा अंत करणे, अंतरात जाती संपवण्याचा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. चळवळी विचारांच्या स्तरावर असणे आवश्यक आहे.’ ऍड. गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा सर्वंकष विचार करण्यासाठी खोलवर विचार करणे गरजेचे असल्याचे म्हटले.