पुणे – जलसंपदा विभागाने पाणी वापराच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ दि.1 जुलै या जलआर्थिक वर्षापासून लागू होणार आहे. 2019 या वर्षांपासून पूर्वलक्षी प्रभावाने हे दर लागू केले जाणार आहेत. या दरानुसार महापालिकांना जलसंपदा विभागाला पैसे द्यावे लागणार आहे.
जलसंपदा विभागाने 2018 मध्ये पाणीदरात वाढ केली होती. परंतू करोनामुळे दरवाढीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत दि.30 जून 2022 रोजी संपणार आहे. त्यानुसार जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने फेब्रुवारीत राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीवापराचे दर निश्चित केले. ते पुढील तीन वर्षांसाठी लागू असणार आहेत. दि.1 जुलै 2023 ते दि. 30 जून 2024 या जलवर्षासाठी 10 टक्के सरळ दरने वाढीसह लागू राहणार आहे. महापालिकांना सध्या धरणातून थेट पाणी उचलल्यास प्रति हजार लिटरला 25 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रती हजार लिटरला 50 पैसे दर होते.
ते आता महापालिकांना घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी उचलल्यास प्रतिहजार लिटरला 55 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रति हजार लिटरला 1.10 रुपये आकारण्यात येणार आहेत. आता नव्या दरानुसार महापालिकांना जलसंपदा विभागाकडे पैसे द्यावे लागणार असल्याने याचा अप्रत्यक्ष बोजा नागरिकांवर पडणार आहे.