* पोलिसांबाबतची नाराजी केली उघड
* महिला पोलीस पाटलांनी प्रपंचातून समाजकारण करावे
* पोलीस पाटलांनी सकारात्मक कामे करावीत
राजगुरुनगर – पोलीस पाटलाचे पद हे तलवारीच्या पात्यासारखे आहे. त्यांनी ठरवले तर चांगले काम करता येईल. गावाच्या दृष्टीने पोलीस पाटलांनी सकारात्मक कामे करावीत. असे आवाहन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
ग्रीन वर्ड क्लब पुणे यांच्या वतीने खेड तालुक्यातील पोलीस पाटील, तलाठी यांचे प्रशिक्षण राजगुरूनगर येथील पीडीसीसी बॅंकेच्या सभागृहात घेण्यात आले. यावेळी आमदार मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माईंड ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, ग्रीन वर्ड क्लबचे संस्थापक अध्यक्ष गौतम कोतवाल, पिंपरी चिंचवडच्या अध्यक्षा सुनीता पाटसकर, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पीडीसीसी बॅंकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर, भरत भांबुरे, जितेंद्र चव्हाण, तृप्ती राळे, यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते; मात्र तलाठ्यांनी याकडे पाठ फिरवली.
आमदार मोहिते म्हणाले, पोलीस पाटील हे पद अधिकाराचे आहे. राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसाला सर्वाधिक अधिकार दिले; मात्र आपण गुलामासारखे वागत आहोत. कायद्याची माहिती अवगत करून पोलीस पाटलांनी गावात काम करावे.
महिला पोलीस पाटलांनी प्रपंचातून समाजकारण करावे. यावेळी माईंड ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले. या संस्थेच्या वतीने खेड तालुक्यात एक लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम कोतवाल यांनी केले. सूत्रसंचालन श्रद्धा उपासनी यांनी केले. सुनीता पाटसकर यांनी आभार मानले.
पोलीस पाटलांना गावात दर्जा प्राप्त आहे. गावात पोलीस पाटील तटस्थ राहू शकतो. गावाच्या विकासाच्या गोष्टी पोलीस पाटलांनी हाती घ्याव्यात. कायद्याप्रमाणे त्याची नेमणूक घेतला पाहिजे. सध्या राज्यातील विविध गावातील सरपंचाची अवस्था बिकट होत चालली आहे. दोन महिन्यांत सरपंच बदल होत असल्याने यासाठी वेळीच कायदा होणे आवश्यक आहे. कायद्यात तरतूद करून गावाला स्थैर्य प्राप्त होईल. गावातील एकच आशास्थान आहे, ते म्हणजे पोलीस पाटील.
-चंद्रकांत दळवी,
महाळुंगे पोलीस स्टेशन अनधिकृत?
महाळुंगे येथे पोलीस चौकी होती. ऑप्शनचे पोलीस स्टेशन होते. महाळुंगे येथील पोलीस ठाण्याला अजूनही अधिकृत मान्यता नाही; मात्र हे पोलीस स्टेशन अनधिकृतपणे चालवले जात आहे. गेली पाच वर्षात याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे चौकशी केली. पहिल्या आयुक्तांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दुसरे आणि तिसरे पोलीस आयुक्त आले त्यांनी केवळ चौकशीच सुरू ठेवली आहे. पाच वर्षे हे बेकायदेशीर पोलीस स्टेशन चालवले जाते आहे. याबाबत मी विधान सभेत आवाज उठवला आहे, असे मोहिते म्हणाले.
पोलिसांबाबत ब्र काढणे भीतीचे
आताचे पोलीस अधिकारी ब्रिटिश अधिकाऱ्यांसारखे वागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एखाद्या गावात अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम आता परमेश्वरच करू शकतो, अशी स्थिती आहे. कोणत्याही व्यवस्थेवर आपला विश्वास राहिला नाही. आम्ही अनुभवले, आम्ही भोगत आहे. इतकी भयानक परिस्थिती आहे. पोलिसांबाबत ब्र काढणे काढणे भीतीचे झाले आहे. आमदार सुद्धा त्यांच्याबाबत बोलू शकत नाही.
महाराष्ट्राचे दुर्दैव…...
राज्य सरकार नवनवीन योजना आणते. त्याची सध्या विधानसभेत चर्चा होत नाही. केवळ विरोधासाठी विरोध होतो गोंधळ सुरु होतो अनेक विधेयके मंजूर होतात. सभागृहात विरोधी पक्ष केवळ गदारोळ करतो. विरोधी पक्षाला याचे भान राहिले नाही. विधेयक मंजूर होण्यापूर्वीच त्यातील गुणदोषावर चर्चा झाली तरी पुढे त्याची अंमलबाजवणी चांगली होईल. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, मराठी अधिकारी असेल तर ते महाराष्ट्राच्या विचार करतात अन्यथा बाहेरील राज्यातील अधिकारी राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करत नाही.