सहकारनगर -तळजाई टेकडीवर वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने नैसर्गिक अधिवास कमी होत आहे. उन्हाळ्यात आग लागून झाडांचे व जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. टेकडीवर लागणारी आग मानव निर्मित असून दारूडे, गर्दुल्ये येथे व्यसने करतात यातूनच आग लागण्याचे प्रकार घडत असल्याचे वन कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. परंतु, वणवा तसेच मानव निर्मित आग लागल्यानंतर वनखात्याकडे स्वत:ची अशी कोणतीच प्राथमिक यंत्रणा, साहित्य नाही. याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
550 एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या वनात सुरक्षा कर्मचारी, गार्डस यांचा अभाव असणे ही दुर्दैवाची बाब आहे. यासाठी निधीच नाही म्हणून कर्मचारी भरती होत नाही, असे वारंवार सांगितले जाते.
तळजाई टेकडीवरील पाचगाव पर्वती साधारण 550 एकर आहे. या विस्तीर्ण वनक्षेत्रात हजारो पक्षी, वन्य प्राण्यांसह अनेक प्राणी सरपटणारे प्राणी, किटक यांचा अधिवास आहे. यासह नैसर्गिक देशी वृक्ष, काटेरी वृक्ष यासह विविध पानाफुलांची देणगी तळजाईमुळे शहराला लाभली आहे. परंतु, कळत नकळत या वनात मानव निर्मित आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून, तळजाई टेकडी वनक्षेत्राचा सुरक्षिततेचा व संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टेकवडीवर बेकायदा वृक्षतोड होत असतानाच दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. वनात पत्ते व दारूचे अड्डे तयार झाल्याने वनपरिसरात प्रचंड प्लॅस्टिक व तत्सम कचरा साचत आहे. या गोष्टींचा परिणाम येथील पक्षी व प्राण्यांच्या अस्तित्वावर होऊ लागला आहे. त्यातच वनक्षेत्रातील काही भागात अनावश्यक सिमेंटची कामे झाली आहेत. वनक्षेत्रात काही वर्षांपूर्वी विदेशी झाडे काढून देशी झाडे लावण्याची योजना आखली गेली. परंतु, या योजनेच्या नियोजनातच विस्कळीतपणा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यात वन, टेकड्या, जंगलांमध्ये असलेला गवताळ भाग सुकून व पूर्णपणे वाळून जातो. गवताळ प्रदेश ही निसर्गामधील मोठी परिसंस्था असते. यात अनेक छोटे मोठे कीटक, सरपटणारे प्राणी यांचे हक्काचे आश्रय स्थान असते. परंतु, निसर्गाऐवजी मानव निर्मित वणव्याच्या भक्ष्यस्थानी हे सर्व काही पडते तेव्हा मोठा नाश होत असतो. या आगीत औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, देशी झाडे यांचेही मोठे नुकसान होते. या करता वनक्षेत्रातील आग विझविण्यासाठी प्राथमिक यंत्रणा तसेच कर्मचारी असणे गरजेचे महत्त्वाचे आहे
– लोकेश बापट, टेलस ऑर्गनायझेशन