मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासह भीमाशंकर अभयारण्यलगत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात असून खाजगी शेतमालक शेतात असलेल्या वृक्षांची परस्पर तोड करत असून सदर वृक्षतोड व त्याची वाहतूक वन विभागाची परवानगी घेऊनच करावी अन्यथा संबंधितांवर वनविभाग कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वृक्षतोड केलेला माल व वाहने ताब्यात घेऊन सरकार जमा करण्यात येईल, असे घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी सांगितले.
वनविभागाच्या वतीने फुलवडे (ता. आंबेगाव) येथील पांडुरंग श्रावण हिले यांनी त्यांच्या शेतात सागाची झाडे परवानगी न घेता तोडल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून झाडे (माल) जप्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वन विभागाची परवानगी घेऊनच शेतातील झाडे आवश्यक असेल तरच तोडावी व त्याची वाहतूक करावी.
भीमाशंकर अभयारण्यलगत पश्चिम घाट भागात हिरडा, साग, महूआ, आंबा, फणस, खैर, चिंच, चंदन, बिजा, हळदु, तिवास, एन, खारफुटी, जांभूळ, अंजन किंजळ यासह विविध देशी वृक्ष असून येथील अनेक वृक्ष हे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहे.
वृद्वतोडीसाठी परवानगी घ्या….
हे वृक्ष नैसर्गिक साधन संपत्ती असून वृक्षांची तोड केल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होत असून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. या वृक्षांची अवैध तोड करू नये तसेच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीत असलेल्या वृक्षांची तोड करताना वनविभागाची परवानगी घ्यावी, असे आवाहन जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.