पुणे –पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी यंदा कटऑफ जवळपास 5 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील काही महाविद्यालयाने प्रथम प्रथम वर्षाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यावरून यंदा पदवीच्या प्रवेशासाठी कटऑफ वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची लेखी परीक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा विक्रमी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे पदवी प्रवेशासाठी यंदा बहुसंख्य विद्यार्थी इच्छुक असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच निकाल चांगला लागल्याने कटऑफ वाढल्याचे सांगण्यात आले आहे.
बहुतांश महाविद्यालयांचे पदवी प्रथमवर्ष ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. महाविद्यालयाने प्रवेशाचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे काही महाविद्यालये गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली, तर काही महाविद्यालये यादी प्रसिद्ध करण्याच्या मार्गावर आहेत.
महाविद्यालयांच्या पदवी प्रवेशाचा कटऑफ जाहीर करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेचा विचार करता यंदा 5 टक्क्यांच्या आसपास कटऑफ वाढला आहे. याचप्रमाणे अन्य महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यंदाच्या वर्षी कटऑफ वाढल्याचे म्हटले आहे.
-डॉ. आर. एस. झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर