वडूज -बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी औंधच्या शुभम शिंदे मित्र समूह व खटाव तालुका बैलगाडा शर्यतीप्रेमी संघटनेने केली आहे. याबाबत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांना आज लेखी निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी की, शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी आणल्याने आज शेतकऱ्याच्या दावणीला बैलांची संख्या कमी झाली आहे. शेतकरी आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे बैलास जपत आहेत. त्यामुळे तो बैलावर अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही, निसर्गाच्या विविध अडचणींवर मात करून विरंगुळा म्हणून बैलगाडी शर्यतीत सहभागी होत असतो. बैल पाळीव प्राणी आहे. मात्र त्याचा समावेश वन्यप्राण्यात केल्याने तथाकथित प्राणीमित्रांचे फावले आहे.
परिणामी बैलांची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. तरी ग्रामीण भागाच्या अर्थचक्राच्या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.