येरवडा, दि. 1 (प्रतिनिधी) -अग्निशमन दलाने आग लागलेल्या घटनास्थळी तातडीने पोहोचणे गरजेचे असते, यासाठी अग्निशमन दलाचे जवान तत्पर असतात. मात्र, काही ठिकाणी वाहतूक कोंडी तर कधी झोपडपट्टी सारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी आग लागल्यास त्याठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्यातसाठी मोठी अडचण येते, कसरत करावी लागते. परंतु, नगर महामार्गावर शिवशाही बसला लागलेली आग विझविण्यासाठी निघालेल्या अग्निशमन दलाला “प्रशासकीय कारभाराचाच अडथळा’ पार करावा लागला.
नगर रस्त्यावर वाडिया बंगल्यासमोर मंगळवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला आग लागली, बसने रस्त्यावरच पेट घेतल्याने आग मोठी होती. अग्निशमन दलाला माहिती कळविताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी निघाले. गोल्फ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने गुंजन चौकातून हे वाहन गेले. मात्र, या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच मेट्रोचे काम सुरू असल्याने बीआरटी मार्ग बंदच ठेवलेला आहे या मार्गातून कोणते वाहन जावू नये यासाठी मार्गातच मोठे दगड आडवे टाकण्यात आले आहेत. याच दगडांचा अडथळा अग्निशमनच्या वाहनाला आला.
शास्त्रीनगर चौकात इतर वाहनांनी जाऊ नये यासाठी मोठमोठ्या दगडांचा अडथळा ठेवण्यात आला होता. त्यामुळे अग्निशमन जवानांना हे दगड बाजूला करून मार्ग खुला करावा लागला. त्यानंतर शिवशाही बसला लागलेल्या आगीच्या घटनास्थळी पोहोचता आले. यात वेळ गेल्याने आगीत बसचा बराचसा भाग जळून गेला.
शहरातील अनेक भागात अचानक होणाऱ्या आगीच्या घटनांवेळी अग्निशमन दलाचे वाहन व जवान त्वरित पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, अनेक भागात अडथळा निर्माण होत असतात. परिणामी, आगीमध्ये जास्त नुकसान होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनाना तसेच रुग्णवाहिका अशा सेवेसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी पोलिसांनी तसेच नागरिकांनाही प्राध्यान्य गरजेचे आहे.