औंध – मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. 14) औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतारवाडी, बोपोडी परिसरामध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदला परिसरातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी परिसरातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी तसेच सुतारवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीची सुरुवात केली. सर्व ठिकाणचे कार्यकर्ते बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जवळ एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून बालेवाडी फाटा येथील उपोषण स्थळावर एकत्र जमले.
यावेळी शेकडो मराठा समाजाच्या नागरिकांनी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या. मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी बाणेर, बालेवाडी फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
काय आहेत मागण्या ?
यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, तसेच जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जची सखोल चौकशी करण्यात यावी, सारथी संस्थेच्या निधी व उपक्रमांमध्ये वाढ करावी, एखाद्या गावामध्ये मराठा समाजाच्या भावकीत ओबीसी प्रमाणपत्र असल्यास त्याआधारे त्या गावातील आडनावाच्या सर्वांना अर्ज प्रक्रियाद्वारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, जातीय जनगणना करण्यात यावी, तसेच बाणेर बालेवाडी परिसरामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधण्यात यावे, आदी मागण्या आंदोलकांतर्फे करण्यात आल्या. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.