पुणे (संजय कडू) -उन्हाळी सुट्ट्या लागल्याने पुण्यात नातेवाईकांकडे तसेच पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे पीएमपी बसमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. हे हेरून परराज्य आणि अन्य जिल्ह्यांतील चोरट्यांच्या टोळ्या पुण्यात सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये महिला चोरांचाही समावेश आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेत बांगड्या, दागिनेही चलाखीने ते कापून घेत आहेत.
स्वारगेट, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, हडपसर बस स्थानकांबाहेरील पीएमपीचे स्टॅंड हेरून चोरटे थांबतात.
प्रवाशांची गर्दी असलेली बस पाहून डाव साधतात. पोलिसांनी वर्षभरात अशा दोन टोळ्या जेरबंद केल्या. त्या सध्या कारागृहात आहेत.
सध्या नव्याने काही टोळ्या दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार साध्या वेशातील पोलीस बस थांब्यावर लक्ष ठेऊन आहेत. काही कर्मचाऱ्यांना बसमधून प्रवास करण्याचा “टास्क’ही दिला आहे.
दरम्यान, महिलांनीदेखील प्रवासावेळी दागिने वापरू नये असे आवाहन पोलीस वारंवार करत आहेत.
चोरीची पद्धत
टोळीमध्ये चार-पाच महिला, दोन-तीन पुरुष असतात. प्रवासी चढताना गर्दी आणि धक्काबुक्की करत बसमध्ये चढण्याचा प्रयत्न ते करतात. प्रवासी बॅग आणि कपडे सांभाळतानाच चोरटे कटरच्या सहाय्याने बांगडी किंवा मंगळसूत्र कट करुन घेतात. ते हळूच एकामागे एक उभ्या असलेल्या त्यांच्या साथीदारांकडे दिले जाते. शेवटचा साथीदार ते घेऊन धूम ठोकतो. प्रवाशाला टोळीतील एखाद्या महिलेचा संशय आला, तरी तिच्याकडे चोरलेला दागिना नसतो. तिला मदत करायला टोळीतील इतर महिला प्रवाशाच्या अंगावर धाऊन जातात.
हे चोरटे बसमध्ये महिला प्रवाशांना हेरतात. त्यांच्याभोवती कोंडाळा करून दागिना कट करतात आणि पुढील बस थांब्यावर उतरतात. हे चोरटे उपनगरांत तात्पुरते भाड्याने राहतात. उन्हाळी आणि दिवाळीची सुट्टी साधून टोळ्या पुण्यात येतात.
दागिने चोरणाऱ्या टोळ्या एकट्या तसेच ज्येष्ठ महिला प्रवाशांना टार्गेट करतात. अंगावरील दागिने कट करण्याबरोबच प्रवाशांच्या पर्समधील दागिनेही अलगद चोरले जातात. चोरी झाल्यानंतर उशिरा प्रवाशांच्या लक्षात घटना येते. यामुळे कोणत्या बस थांब्यावर चोरटे उतरले हे कळण्यास पोलिसांना अडचण येते.
बीड-धाराशिव ‘कनेक्शन’
पीएमपीमध्ये दागिने चोरणाऱ्या बहुतांश टोळ्या बीड, धाराशिव आदी जिल्ह्यांतून पुण्यात येतात. मध्यंतरी महिलांची एक टोळी पकडली होती. त्यामध्ये आई, मुलगी, जावई, मावशी असे नात्यातील सदस्य होते. महिनाभर पुण्यात राहून दहा-बारा चोऱ्या केल्यावर टोळ्या माघारी गावी जातात. चोरीचे सोने ओळखीच्या स्थानिक सराफास विकले जाते. यातून किमान सहा महिने तरी त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पैसे संपल्यानंतर पुन्हा गणेशोत्सव, शाळांच्या सुट्या पाहून टोळ्या पुण्यासारख्या शहरांत धुमाकूळ घालतात.
पीएमपी बसमधील चोऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही अशा टोळ्यांवर लक्ष ठेवून आहोत. मध्यंतरी अशा काही टोळ्यांवर कारवाई करण्यात आली होती.
– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे
पोलीस प्रशासनाशी चर्चा करून चोरी होणारे विशिष्ट ठिकाणे, वेळ, मार्ग यांची माहिती घेऊन गर्दीच्या वेळेस जास्तीच्या बस सोडण्यात येणार आहे. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजची प्रवाशांनी किंवा पोलिसांनी मागणी केल्यास ते उपलब्ध करुन दिले जातील.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी
पोलीस म्हणतात…
बहुतांश पीएमपी बसमध्ये बसवण्यात आलेले सीसीटीव्हीही व्यवस्थित कार्यरत नाहीत. किंवा त्यांचे चित्रिकरण पुसट येते. यामुळेही तपासात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेत गुन्हे शाखेने त्यांची पथके तयार केली आहेत. तसेच नागरिकांनाही प्रवास करताना मौल्यवान दागिने वापरू नयेत असा सल्ला दिला आहे.