पुणे –महापालिकेकडून दहावी-बारावीच्या गुणवंताना दिली जाणारी शिष्यवृत्ती महापालिका निवडणुकीपूर्वी देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयाला लाभ तब्बल 16 हजार विद्यार्थ्यांना होणार असून 31 मार्चपूर्वी ही शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेकडून 60 टक्के अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि 40 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले, तर 10 वीच्या विद्यार्थ्यांना 15 हजार आणि 12 वीसाठी 25 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महापालिकेने यावर्षी अर्ज सादर करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार 10 वीचे 7 हजार 878 आणि इयत्ता 12 वीचे 8 हजार 96 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यातील 9 हजार अर्जांची पडताळणी झालेली असून मार्च अखेरपर्यंत ही पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शिष्यवृत्ती जमा करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे मोळक यांनी सांगितले.