पुणे- वाढत्या खाद्यतेलाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्यावर केंद्र शासनाने मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार किरकोळ व्यापाऱ्यांना खाद्यतेल हे 30 क्विंटल तर घाऊक व्यापारी यांना 500 क्विंटलपर्यंत खाद्यतेलाचा साठा ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे. तर खाद्यतेलबियांसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना 100 क्विंटल तर घाऊक व्यापाऱ्यांना दोन हजार क्विंटलपर्यंत साठा ठेवता येणार आहे. यामुळे साठेबाजीला आळा बसणार आहे. तसेच खाद्यतेलांच्या दरावर नियंत्रण राखणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्याने केंद्र शासनाने हे आदेश लागू केले आहेत. साठवणुकीवर हे निर्बंध 30 जून 2022 पर्यंत लागू राहणार आहे. तेलबियांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांसाठी 90 दिवसांची साठवणूक क्षमतेनुसार साठा करता येणार आहे. खाद्यतेलांच्या दर नियंत्रित रहावे, यासाठी राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे. जर संबधित घटकांकडे असणारा खाद्यतेल व तेलबियांचा साठा निर्बंधाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबधितांनी त्याबाबतचा तपशील अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करावा, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.