सासवड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदर विमानतळाची जागा अजून निश्चित नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ हे सुपे जवळ होणार, आमदार संजय जगताप यांनी विमानतळ हे पुरंदरमध्येच होणार तर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील पूर्वीच्याच जागी विमानतळ व्हावे यासाठी सुरू केलेला संघर्ष यामुळे पुरंदर आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजीराजे विमानतळाचा खेळखंडोबा सुरू आहे. राजकीय प्रतिनिधी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून विमानतळ नेमके कोठे होणार याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असल्याची पहिली बातमी कळली तेव्हा पुरंदर तालुक्यातील जनतेने आनंद व्यक्त केला; परंतु तालुक्यातील पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, वनपुरी ही सात गावे विमानतळासाठी सुचविण्यात आली. त्यानंतर या सात गावांतील ग्रामस्थांनी आमच्या गावात विमानतळ नको यासाठी आंदोलने केली. तर विमानतळ पुरंदरमध्येच होणार; परंतु या सात गावांत होणार नाही, असा विश्वास 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी संजय जगताप यांनी या सात गावांतील ग्रामस्थांना दिला.
काही झाले तरी या सात गावांमध्येच विमानतळ होणार या भूमिकेवर त्यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे ठाम राहिले. आमदार झाल्यानंतर संजय जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बरोबर घेऊन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन नवीन जागा सुचवली त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील नवीन जागेतील रिसे, पिसे, नायगाव, राजुरी, पांडेश्वर व बारामती तालुक्यातील भोंडवेवडी, चांदगुडेवाडी, आंबी या गावांचा पर्याय सुचवला होता. या नवीन जागेलाही ग्रामस्थांनी विरोध केला व विमानतळ संबंधित सर्व विभागांना पत्र व्यवहार करून विरोध दर्शविला होता, त्यामुळे विमानतळाचे “टेक ऑफ होणार की नाही’ यावर कोणाकडूनही योग्य माहिती येत नाही.
खेडमधील नेते सरसावले
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आमदार संजय जगताप यांनी सुचवलेली नवीन जागा योग्य नसल्याचे सांगत हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने नामंजूर केल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर खेड तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी खेडमध्ये विमानतळ होऊ द्या यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.