पुणे – शहरात रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना मारझोड करुन मोबाईल चोरण्याचे सत्र सुरु होते. विशेषत: रेड लाईट एरियातील नागरिकांना टार्गेट केले जात होते. जेणेकरुन ते तक्रार देणार नाहीत. या टोळीने मागील काही दिवस धुमाकूळ घातला होता. या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निखील गोपाळ साळुंखे (20 रा. गंज पेठ, लोहीया नगर) अथर्व अमर अवघडे (19, रा. गंजपेठ, समाज मंदिरा जवळ) आणि प्रितम प्रदिप कांबळे (22 रा. गंजपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. प्रितम प्रदिप कांबळे याचेवर यापुर्वी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश साबळे यांना खबर मिळाली की, निखील साळुंखे, अथर्व अवघडे व प्रितम कांबळे यांनी मागील आठवड्यात पुणे शहरातील वेग-वेगळ्या ठिकाणावरुन रस्त्याने येणारेजाणारे लोकांचे मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावुन घेतले आहेत.
हे मोबाईल ते विकण्यासाठी घेवुन चालले असुन, सध्या ते महात्मा फुले वाडयाजवळ थांबलेले आहेत. त्यानूसार लागलीच एक पथक तयार करुन आरोपींना छापा टाकून ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता एका पिशवीत तीन मोबाईल हॅन्डसेट मिळुन आले.
त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी तीन्ही मोबाईल हे मोटर सायकलवरुन जावुन रस्त्याने जाणारे-येणारे लोकांकडुन जबरस्तीने हिसकावुन घेतले असल्याचे सांगितले. त्यापैकी एक मोबाईल हॅन्डसेट तीन मे रोजी पहाटे ट्राय मी या कपडयाच्या दुकानासमोर कस्तुरी चौक येथून एका फोनवर बोलत चाललेल्या मुलाचे हातातुन हिसकावुन घेतला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच श्रीकृष्ण टॉकीज, बुधवार पेठ येथून आणखी दोन मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहते. आरोपींकडुन एक बजाज पल्सर मोटर सायकल व तीन मोबाईल फोन असा 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार, अमोल पवार, निलेश साबळे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, आण्णा माने, शुभम देसाई, शंकर कुंभार यांनी केली आहे.