पुणे- अत्यावश्यक कामांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत. त्यानंतरच पुढील खोदाई टप्प्याटप्याने करावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी पालिका प्रशासनास दिले. तसेच शहरातील खड्ड्यांबाबत गुरुवारी समान पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी तसेच कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक रासने यांनी बोलवली आहे.
शहरात गेल्या आठवडाभराच्या पावसाने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पावसाळ्यातही पालिकेने समान पाणी योजना तसेच ड्रेनेज विभागाची कामे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदाई झालेली आहे. तर, या रस्त्यांची दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे महापालिकेवर टीकेचा भडिमार होत असून,याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, “महापालिकेतील सत्ताधारी म्हणून ही जबाबदारी आमचीच आहे,’ असे सांगत रासने यांनी “पुढील 15 दिवसांत रस्ते पूर्ववत केले जातील,’ असे मंगळवारी स्पष्ट केले. त्यानंतर रासने बुधवारी प्रशासनास सर्व खोदाई थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रासने म्हणाले, “शहरात सध्या समान पाणीपुरवठा योजना आणि ड्रेनेज लाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे करताना प्रशासनाकडून ती टप्प्याटप्याने होणे अपेक्षित होते. त्यानुसार, थोडेथोडे काम करून रस्ता तातडीनं पूर्ववत होईल, याची खबरदारी घेणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही स्थिती उद्भभवली आहे. यापुढे शहरात कोणत्याही प्रकल्पासाठी एक इंचही जागा न खोदता आधी खोदाई केलेले रस्ते 100 टक्के पूर्ववत करावेत. त्यानंतरच पुढील खोदाई करावी. तसेच पुढील खोदाईनंतर लगेच रस्ते पूर्ववत होतील, याचा कालावधीसह कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
खोदाई सुरू असलेल्या विभागांची तातडीची बैठक बोलवली असून पहिली बैठक समान पाणी योजनेच्या कामासाठीची असेल.’
प्रशासनाने खोदाईनंतर रस्ते पूर्ववत करण्याचे नियोजन अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात एकाच वेळी अनेक कामांसाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर दुरुस्तीचे कामही योग्य झालेल्या नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सर्व खोदाई थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, मनपा
शहरातील रस्त्यांची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य झालेली नाहीत. तसेच रस्ते खोदाईनंतर फुरदुरुस्तीची कामेदेखील अर्धवट व निकृष्ट झाली आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी कोट्यवधींचे टेंडर काढले असूनही शहर खड्ड्यात गेले आहे. महानगरपालिकेकडून रस्ते विकसित करताना तो खराब झाल्यास संबंधित ठेकेदाराने पूर्ववत करावा, यासाठी डिफेक्ट लायबिलिटी पीरियड निश्चित केलेला असतो. असे असतानाही प्रशासनाकडून डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मधील रस्त्यांवरील खडडे बुजविणेचे काम केले जात असून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे.
– आबा बागूल, गटनेते, कॉंग्रेस