पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांच्या पोलीस कोठडीत 29 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ललित पाटीलसह 8 आरोपी पोलीस कोठडीत होते. त्यांची कोठडी संपल्याने (शुक्रवारी दि. 24) त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. अरविंदकुमार लोहारे याने हा कट रचला आहे. आणखीन काही जणांचा या कटात सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. तसेच, तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्याबाबतही अधिक तपास करायचा आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
तर, आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने पोलिस सातत्याने कोठडी वाढवत आहेत. कोठडीची मागणी करताना पोलिस मांडत असलेल्या मुद्द्यात काहीही नवीन नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
‘सीडीआर’मधून महत्त्वाची माहिती
हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या “सीडीआर’ (कॉल डिटेल्स) मधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवून हवी आहे, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या तिघांचे बॅंक डिटेल्स मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. तसेच, इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचाही तपास करणे बाकी आहे, असे पोलिसांनी सांगितले.