1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्टअखेर 4 हजार 273 अर्ज
3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला: 20 महिन्यांत एक हजार 910 अर्ज मंजूर
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – पूर्वी घटस्फोटासाठी एकतर्फी अर्ज जास्त असायचे. मात्र, अलीकडच्या काळात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या अर्जाचे प्रमाण वाढले आहे. आमचे आता पटणार नाही आणि एकत्र राहणे तर शक्यच नाही, अशी खात्री पटली होती. आम्हा दोघांचे वय 32 च्या आत आहे. आर्थिक परिस्थिती देखील चांगली आहे. एकत्र राहून एकमेकांना त्रास देण्यापेक्षा वाद न घालता विभक्त होऊ आणि पुन्हा नवीन आयुष्य सुरू करू, या भावनेतून माधव आणि माधवी (नावे बदललेली) परस्पर संमतीने वेगळे झाले.
या जोडप्याच्या आयुष्यात आलेला प्रसंग सध्या अनेकजण अनुभवत आहे. त्यामुळे वाद घालत आयुष्य जगण्यापेक्षा एकत्र बसून शांतपणे चर्चा करू, एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊ आणि विभक्त होऊ, अशी मानसिकता वाढत आहे. अशा प्रकारचे दररोद सरासरी पाच दावे दाखल होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 20 महिन्यांत येथील कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन हजार 152 अर्ज दाखल झाले आहेत.
तर या काळात संमतीने विभक्त होण्याचे एक हजार 912 दावे निकाली काढण्यात आले आहेत. तर एकतर्फी घटस्फोट, नांदवयास येण्यासाठी आणि विवाह रद्द बातल करण्यासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2020 अखेरीस 4 हजार 273 अर्ज आले आहेत. या कालावधीत याबाबतचे 3 हजार 484 अर्जांवर निकाल देण्यात आला आहे. पती किंवा पत्नी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याच्या तुलनेत 90 टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत.
या कारणामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास नागरिक दर्शवितात तयारी
– शारीरिक व मानसिक त्रास कमी होण्यासाठी
– मर्जीने अर्ज केल्याने द्वेष भावना निर्माण होत नाही
– वेळ व पैसा वाचतो व कमी वेळा न्यायाला जावे लागते
– घटस्फोटाची प्रक्रिया लवकर होते
– एकमेकांची बदनामी होत नाही
मुलांना जास्त त्रास सोसावा लागत नाही
क्षुल्लक कारणावरून होणारे वाद वाढत आहेत. कपडे कोणते घालायचे, यासारख्या किरकोळ कारणावरून झालेले भांडण न्यायालयात पोहोचते आहे. मुलगा-मुलगी दोन्हीकडील नातेवाइकांचा संसारातील वाढता हस्तक्षेपही पती-पत्नीतील भांडण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. गेल्या काही कालावधीमध्ये अशा दाव्यांचे प्रमाण वाढले आहे. दावा दाखल करण्यापूर्वी दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ते शक्य नसेल तरच संमतीने विभक्त होण्याचा सल्ला दिल्ला जातो.
– ऍड. भाग्यश्री गुजर-मुळे, खजिनदार, पुणे बार असोसिएशन